जिल्हा परिषदेत वाहन घोटाळ्यावरून राजकारण तापले

राजू शेळकेंचा सत्ताधार्‍यांवर निशाणा

by Team Satara Today | published on : 02 June 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वाहनांच्या कायदेशीर कागदपत्रांच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हा परिषद सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र (राजू) शेळके यांनी प्रशासनासह सत्ताधारी पदाधिकार्‍यांवर गंभीर प्रश्‍न उपस्थित करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या ताब्यातील 102 रुग्णवाहिकांसह अनेक वाहनांचे विमा, फिटनेस, पासिंग, पीयूसी आदी कागदपत्रे मुदतबाह्य झाल्याचा दावा करत शेळके यांनी हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा विषय नसून जनतेच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्‍न असल्याचे म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

शेळके यांनी यावेळी सत्ताधार्‍यांवर अप्रत्यक्ष टीका करत जिल्हा परिषदेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सेवा देणार्‍या वाहनांच्या बाबतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असताना संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांचे दुर्लक्ष कसे झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या मुद्द्यावरून आगामी काळात जिल्हा परिषद आणि स्थानिक राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून या प्रकरणात काय भूमिका घेतली जाते आणि चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सात दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर जनआंदोलन उभारण्याचा इशारा शेळके यांनी दिल्याने हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हा विषय विरोधकांसाठी महत्त्वाचा राजकीय मुद्दा ठरण्याची चर्चा सुरू झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यात चित्रपटसृष्टी उभारण्यासाठी प्रयत्न करणार : मेघराज राजेभोसले
पुढील बातमी
शपथपत्रातील माहितीवरून दोन नगरसेवक अडचणीत

संबंधित बातम्या