सातारा: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी आणि दानपेटीतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सातारा येथील श्री हनुमान मंदिर परिसरात 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदामाई पाटील, पंचायत समिती सदस्य रवी बडेकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष भानुदास माळी, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमाराजे घोरपडे, प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कदम, रफिकभाई, अन्वरभाई, सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान, एससी विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, मनोजकुमार तपासे, कराड दक्षिण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली जाधव, मनीषा साळुंखे, रजनी पवार, धनश्री महाडिक, प्रदीप जाधव, दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील म्हणाले कि, श्रीराम मंदिरासाठी देशभरातील भाविकांनी श्रद्धेने रोख रक्कम, सोने-चांदी व इतर मौल्यवान वस्तू दान केल्या आहेत. या देणग्यांबाबत समोर आलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. हा विषय केवळ आर्थिक गैरव्यवहाराचा नसून कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंदोलनानंतर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. तसेच या प्रकरणात पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणीही करण्यात आली.