भोपाळ : हमीभावासह मुगाची १०० टक्के खरेदी करण्यात यावी यासाठी मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन अधिकच तीव्र झालं असून, हजारो शेतकरी राज्याची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. नर्मदापुरम, हरदा, सिहोर, रायसेन आणि विदिशा आदी ठिकाणांहून १९ शेतकरी संघटनांच्या शेतकऱ्यांनी पोलिसांनी केलेली बॅरिकेटिंग उद्ध्वस्त करून भोपाळमधील वीर सावरकर सेतू पार करून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने कूच केली आहे. दरम्यान, आज संध्याकाळी आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिलं आहे.
राज्याच्या विविध भागातून भोपाळमध्ये दाखल झालेले हजारो शेतकरी बस आणि इतर वाहनांवर चढून घोषणाबाजी करत आहेत. तर या उग्र जमावाला रोखताना पोलीस आणि सुरक्षा दले हतबल झालेली दिसत आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीत मुख्यमंत्री मोहन यादव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.आमचं सरकार हे शेतकऱ्यांसोबत सदैव उभं आहे. आम्ही सकारात्मक सल्ल्यासह संवादाच्या माध्यमातून समस्येचं समाधान शोधतो. जनतेला कुठल्याही प्रकारचं कष्ट होऊ नये, याची काळजी दोन्ही पक्षांनी घेतली पाहिजे, आमच्या सरकारने एक विशेष समिती स्थापन केली आहे, ती शेतकऱ्यांशी सतत संपर्क ठेवून आहे,असे मोहन यादव यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री मोहन यादव हे आझ संध्याकाळी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना भेटतील, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या आंदोलक शेतकऱ्यांचा मुख्य विरोध हा सरकारकडून निर्धारित करण्यात आलेल्या खरेदी मर्यादेला आहे. एक एकर शेतामध्ये साधारणपणे ४ ते पाच क्विंटल मूग पिकतो. मात्र सरकारचा हमीभाव हा केवळ १.२० क्विंटल मुगालाच मिळतो. उर्वरित मूग शेतकऱ्यांना बाजारात कमी दरात विकावा लागतो, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.