सातारा : आपल्या काही मागण्यांसाठी सातार्यात दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या कार्यालयाबाहेर दिव्यांग संघटनांनी सामूहिकरीत्या सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी केलेल्या या आंदोलनाकडे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. आमच्या जिवाचे काही बरे-वाईट घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा आंदोलनकर्त्या दिव्यांग बांधवांनी दिला आहे.
दिव्यांगांना संजय गांधी पेन्शन योजना अंतर्गत सहा हजार रुपये मिळावेत, दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी 274 स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी, त्यांना संपूर्ण शिक्षण मोफत मिळावे, दिव्यांगांसाठी प्रतिवर्षी 30 लाख रुपये निधी खर्च करावा, सर्व बँक, शासकीय कार्यालय येथे दिव्यांगांसाठी रॅम्प बनवण्यात यावेत तसेच व्हिलचेअर सुविधा पुरविण्यात यावी, अंत्योदय व दारिद्य्ररेषेखालील यादीतील दिव्यांगांना सरसकट 35 किलो धान्याचे वितरण करावे, शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेसह अन्य संघटनांच्या पदाधिकार्यांनी अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र, आज पाच दिवस उलटूनही स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. यावरुन दिव्यांगांच्या बाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची उदासिनता दिसून येत आहे.
या आंदोलनामध्ये दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, उपाध्यक्ष शैलेंद्र बोर्डे, सदस्य अविनाश कुलकर्णी, दिव्यांग फौंडेशन प्रणित संघटनेचे अध्यक्ष नामदेवराव इंगळे, मानाजी लोहार आदींनी सहभाग घेतला आहे.
दिव्यांग बांधवांनी दिव्यांगांसाठीच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली. तरीही प्रशासनाने प्रत्येक वेळी आश्वासनांची नुसती खैरात वाटली. मुंबई, दिल्लीमध्येही या बांधवांनी आंदोलने करून दुर्लक्ष होत असल्याने व प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याच्या निषेधार्थ सातार्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
जोपर्यंत मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी माहिती दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी दिली. तसेच या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांच्या जिवीतास काही हानी झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असाही इशारा पवार यांनी दिला आहे.
या आंदोलनावेळी नितीन शिंदे, सुदर्शन मालवणकर, बाळासाहेब रवले, पांडूरंग शेलार, दिलिप गार्डे, हरिभाऊ साळुंखे, मारुती माने, संजय कुर्लेकर, संजय प्रकाशे, अमोल भातुसे, माधुरी माधव, लतिका जगताप, सुनिता ओंबळे, शालन लोखंडे, चंपाबाई क्षीरसागर, शोभा मोरे, वनिता जाधव, स्त्री शक्ती ग्रूपच्या 50 सदस्यांची उपस्थिती होती.