सातारा : येथील शाहूनगर परिसरातील सौरभ कोडक या युवकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर एक हजार ८०० फूट रॅपलिंग केले. अवघ्या ३० मिनिटांमध्ये १८०० फूट रॅपलिंग करीत कोकणकडा उतरण्याच्या त्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
सह्याद्रीतील गड, किल्ले, दुर्ग, ऐतिहासिक स्थळे छत्रपती शिवरायांच्या शौर्याची साक्ष देतात. शिवरायांची थोरवी गाणारा हा शिवकालीन इतिहास जाणण्यासाठीच साहसी गिर्यारोहक सौरभ कोडक गेली पाच वर्षे सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकंती करत आहे. त्याने जीवधन, वानरलिंगी सुळका तसेच गडकिल्ले, दुर्ग आणि व्हॅली यांच्या मोहिमा फत्ते केल्या आहेत.
हरिश्चंद्रगडाचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे एक हजार ८०० फूट उंचीचा कोकणकडा. हा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू या अक्षराच्या आकाराचा आहे. कड्याच्या मध्यभागी सुमारे ७५ फूट अंतव्रर्क आहे. सौरभ याने १९ एप्रिलला पाचणाई येथून पहाटे चार वाजता हरिश्चंद्रगड चढण्यास सुरुवात केली. सकाळी सहा वाजता गडावर पोहोचला व त्या दिवशीच सकाळी सात वाजता कोकणकड्यावर पोहोचला.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याने कोकणकड्यावरून रॅपलिंग करायला सुरुवात केली. पहिला ९०० फुटांचा टप्पा पार करायला दहा मिनिटे लागली. हा टप्पा पूर्ण ओव्हरहॅंग म्हणजे, लटकत खाली जाणे असा आहे. दुसरा टप्पा हा ६०० फुटांचा आहे. तो त्याने दहा मिनिटांत पार केला. तिसरा टप्पा ३०० फुटांचा आहे. हा टप्पा दहा मिनिटांत पार केला. येथून पुढे खरी कसरत चालू झाली. येथून बेलपाडापर्यंत जाणारी वाट अतिशय अवघड आहे. वाटेमध्ये मोठी दगडांची वाट पार करून जावे लागले. वाट साधी नाहीच, अंदाज घेत दगडांवर पाय ठेवून जिथे वाट दिसेल तेथे पाय रोवून जावे लागत होते. अतिशय कष्टदायक व सत्त्वपरीक्षा पाहणारी वाट चालून जवळपास साडेपाच तासांचे पदभ्रमण करून पाच वाजता बेलपाडा येथे पोहोचला.
सौरभ हा सध्या नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्याला आहे. त्याला बालपणापासून शिवकालीन इतिहास वाचण्याची आवड होती. पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांसह मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास, गडकिल्ले, दुर्ग, दऱ्या-खोऱ्यांची माहिती वाचताना त्याच्या मनात या स्थळांविषयी विलक्षण आकर्षण निर्माण झाले आणि तो छंदच जडला.