महाराष्ट्रात १३ जूनपासून मान्सून पुन्हा होणार सक्रिय

कृषी विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीबाबत सल्ला

by Team Satara Today | published on : 11 June 2025


पुणे : यंदा मान्सूनने  महाराष्ट्रात वेळेआधीच आगमन केले असून सुरुवातीला अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. काही ठिकाणी तुरळक सरी झाल्या असल्या, तरी सर्वदूर पावसाचा जोर नव्हता. मात्र,  आता १३ जूनपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जूनपासून कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मान्सून जोरात सक्रिय होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचे प्रमाण वाढणार असून या ठिकाणीही अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. येणारा आठवडा आणि पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामुळे राज्यात अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे, सातारा या जिल्ह्यांत पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांनी देखील कृषी विभागाचा सल्ला घेऊन पेरणी करावी, असा सल्लाही दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आठ तोळ्याचे गंठण धूम स्टाईलने लंपास
पुढील बातमी
पीएम मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना कोरोना चाचणी सक्तीची

संबंधित बातम्या