कराड : कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील बेघरवस्तीलगत आमराई शिवारात तरसाने हल्ला करून तब्बल 25 शेळ्या ठार केल्या आहेत. या धक्कादायक घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून या घटनेत सुमारे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे.
गुरुवार, 6 मार्चला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. बाळू श्रीपती चव्हाण यांच्या पंधरा शेळ्या व दहा लहान करडे हल्ल्यात ठार झाली आहेत. घटनास्थळी वनपाल संतोष शिंदे , वनरक्षक सविता कुट्टे, वनरक्षक रोहन माने, वनमजूर शंकर शिंदे यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी अर्चना राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून माहिती दिली. अधिकार्यांनी केलेल्या पाहणीमध्ये तरसाचे ठसे आढळून आले. त्यामुळे बिबट्या नसल्याचे निष्पन्न झाले असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनपाल संतोष शिंदे यांनी केले आहे.
शेतात केलेल्या पाहणीमध्ये आढळलेले वन्य प्राण्याचे ठसे प्राथमिक अंदाजानुसार बिबट्याचे नाहीत. ते ठसे तरस सदृश प्राण्याचे असून लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- सविता कुट्टे, वनरक्षक ओगलेवाडी (अतिरिक्त कार्यभार)