विद्यार्थ्यांना अशा प्रकारची वागणूक देणे चुकीचे; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर राहुल गांधी संतापले; 'पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा'

by Team Satara Today | published on : 21 July 2026


दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांना अशा प्रकारची वागणूक देणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील तरुणांना संधी मिळत नाही. रोजगार आणि भविष्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग एकामागून एक बंद होत आहेत. स्पर्धा परीक्षा हा तरुणांसाठी उरलेला एकमेव मार्ग होता, मात्र पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, जंतर-मंतरवरील विद्यार्थी केवळ शिक्षण व्यवस्थेविरोधात आंदोलन करत नाहीत, तर त्यांच्या भविष्यासाठी लढत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये भविष्याबाबत असलेली असुरक्षितता आणि निराशा गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांनी उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचाही उल्लेख करत सरकारवर टीका केली. मोठ्या उद्योगपतींच्या कार्यक्रमांवर हजारो कोटी रुपये खर्च होत असताना सामान्य तरुणांकडे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवलही उपलब्ध नाही, असा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या मते, हा वाद केवळ शिक्षण व्यवस्थेपुरता मर्यादित नसून देशातील तरुणांच्या भविष्याशी संबंधित मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, जंतर-मंतरवरील आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. आंदोलनस्थळी झालेल्या पोलिस कारवाईनंतर राजकीय वातावरण आणखी तापले असून या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सामाजिक कार्यकर्ते सोनम वाकंचुक यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अखेर 'मेदान्ता' रुग्णालयात हलवण्यास परवानगी
पुढील बातमी
दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे पुन्हा आंदोलन सुरु; आंदोलनाचे वातावरण पुन्हा तापले, आज पुन्हा संसदेवर मोर्चा काढणार

संबंधित बातम्या