'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश

देशाची मोठी हानी

by Team Satara Today | published on : 10 October 2024


मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष पद्मविभूषण रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे आज रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रतन टाटा हे ७ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. त्यासंदर्भात त्यांनीच सोशल मीडियावरून माहिती दिली होती. मात्र मागील काही तासांत त्यांची प्रकृती खालावत गेली आणि बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.

रतन टाटा यांचा जीवनप्रवास रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. रतन टाटा यांना १९९१ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. चेअरमन झाल्यानंतर त्यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले. त्यांनी २०१२ पर्यंत टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. १९९६ मध्ये टाटांनी दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बाजारात 'लिस्टेड' झाली. चेअरमन पदावरून पायउतार झाल्यानंतर टाटा यांना टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते.

जागतिक पातळीवर उदयोग क्षेत्रामध्ये भारताचा दबदबा निर्माण करणारा, लाखो तरुणांच्या हाताला रोजगार देणारा, बहुजनांचा मसिहा हरपला : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

भारतीयत्व जपणारा, व्यापारापेक्षा उदयोगाची मती असणारा, जागतिक उदयोग क्षेत्राला, आपल्या जीवन कार्यकर्तुत्वाने नेहमीच एका उंचीवर नेणारे , एक असामान्य व्यक्तीमत्व लाभलेल्या मा.रतनजी टाटा यांना आज काळाने आपल्या उदरात सामावून घेतले याचे अतिव दु:ख आहे.
काळ कोणासाठी थांबत नाही हे जरी खरे असले तरी मा.रतनजी टाटा यांच्या जाण्याने समस्त भारतीयांना ज्या वेदना होत आहे त्या व्यक्त करण्यासाठी निश्चितच शब्द नाहीत.
आपले उत्पन्न समाजासाठी उपयोगात आणणारा असा अवलिया पुन्हा होणार नाही. मा.रतनजी टाटा यांच्या जाण्याने भारतीय उदयोग आणि सामाजिक क्षेत्रात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरुन येणारी आहे. त्यांच्या जाण्याने आमच्यासह समस्त भारतीयांचा आधारवड हरपला. कालाय तस्मै नम: अश्या शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती घराण्याच्या वतीने आणि समस्त जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुर्गा पेठेत सुमारे 28 हजारांची चोरी
पुढील बातमी
आयुष निदान व उपचार शिबीराचे 14 ऑक्टोंबर रोजी आयोजन

संबंधित बातम्या