सातारा, दि. 8 : शहर परिसरातील एका युवतीचा विनयभंग करून भावाला मारहाण केल्याप्रकरणी सुमारे दहा जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या गटाने कोयत्याने मारहाण व पिस्तूलीचा धाक दाखवून सात तोळे सोन्याची साखळी लंपास केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून या प्रकरणी सात जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, युवतीच्या फिर्यादीनुसार सहा सप्टेंबरला साडेअकराच्या सुमारास शाहूपुरी येथील चौकात भावासोबत गणपती दर्शनासाठी गेलो होतो. त्या वेळी पप्पू लेवे, निखील वाघ, धनंजय शिंदे, आर्यन लेवे, गोट्या उर्फ माधव शिंदे, स्वप्नील चव्हाण, यश घाडगे आणि त्यांच्यासोबत तीन ते चार जण हे आमच्या पाठीमागुन आले. तेव्हा पप्पू लेवे याने माझ्या पाठीमागून येत माझ्या पाठीवरुन हात फिरवून मला मिठी मारुन विनयभंग केला. तेव्हा त्याला भावाने त्रास देऊ नका असे सांगितले. त्यावेळी अन्य संशयितांनी युवतीचा विनयभंग केला तसेच तिच्या भावाला केोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काल पहाटे दोनच्या सुमारास संशयितांनी गडकरआळी येथे भावाला हाताने व काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
काल दुपारी बाराच्या सुमारास संशयितांनी प्रकरण मिटवून घेण्यासाठी अनंत इंग्लीश स्कूलच्या चौकात धनंजय अँटो गँरेज येथे बोलावले. तेथे त्यांनी भावाला व त्याच्या मित्राला लाथाबुक्यांनी, काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर पप्पू लेवे याने भावाच्या डोक्याला पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी देत खिशातून दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी फिर्याद पप्पू लेवे यांनी दिली आहे. त्यानुसार विश्वजित ऊर्फ सोन्या जाधव, विक्रम ऊर्फ बंडा जाधव, शुभम ऊर्फ सोन्या ऊर्फ गहुल्या जाधव, अनुज पाटील, सुभाष जाधव, रुतुराज शिंदे, य़श साऴुंखे व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. अनंत इंग्लिश स्कुल चौकातील धनंजय ऑटो गँरेज या ठिकाणी कामगारांचे पगार करत होतो. यावेळी संशयीतांनी यश घाडगे व रूतुराज शिंदे यांची भांडणे का मिटवली असे म्हणून कोयत्याने व पाईपने मारहाण केली. तसेच गळ्यातील सात तोळे सोन्याची साखळी हिसकावून लंपास केली. त्याचबरोबर विश्वजित ऊर्फ सोन्या जाधव याने लेवे याच्या कमरेतील पिस्तूल काढून त्याच्याच डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच भांडण सोडवायला आलेल्यांना पिस्तूलाने धमकावले असे लेवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.