सातारा : सातारा पालिकेकडून पाणी योजनेचे अत्याधुनिकीकरण (अॅटोमेशन) केले जात असताना आता विद्युत विभागाकडूनही शहरातील पथदिव्यांना तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे कोणता दिवा बंद, कोणता सुरू हे एका क्लिकवर समजणार असून, दिव्यांची तातडीने दुरुस्तीही करता येणार आहे.
सातारा शहरातील पथदिव्यांची संख्या ८ हजार ६९३ इतकी आहे. सध्या एखादा दिवा बंद पडल्यानंतर तो कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येईल तेव्हा अथवा नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची दुरुस्ती केली जाते. या प्रक्रियेत बराच वेळ निघून जातो. हे काम विनाविलंब करता यावे, यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील पथदिव्यांना आधुनिकतेची जोड देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वयंचलन प्रणालीमुळे वीज कर्मचाऱ्यांना जलदगतीने दिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करता येणार आहे. नागरिकांच्या तक्रारीही कमी होणार आहेत.
वीज दिवे सुरू करण्यासाठी सातत्याने टायमर सेट करावा लागतो. टायमर सेट करतानाही अनेक तांत्रिक अडचणी येतात. या अडचणही संपुष्टात येणार आहे. एखाद्या भागातील पथदिवे केव्हा सुरू करायचे व केव्हा बंद हेदेखील विद्युत विभागाला नियंत्रण कक्षाद्वारे एका क्लिकवर करता येणार आहे. या कामासाठी २ कोटी ४० लाखांचा खर्च अपेक्षित असून, पालिकेकडून या योजनेला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी सातारा ही जिल्ह्यातील एकमेव पालिका ठरणार आहे.
असे चालणार काम -
१. शहर व हद्दवाढ भागात 3 स्ट्रीटलाईट मीटर'ची संख्या १८२ आहे. या ठिकाणी १८२ सीसीएमएस (सेंट्रल कंट्रोल्ड मॉनिटरिंग सिस्टीम) मीटर बसविले जाणार आहेत.
२. या मीटरच्या बाजूला एक मोडेम असणार आहे. त्यामध्ये मोबाईलप्रमाणे सीम असणार आहे. सिग्नल घेणे व पाठविणे हे काम मोडेम करणार आहे.
३. पथदिव्यांचा दाब कमी आहे की जास्त आहे, कोणती लाईन बंद आहे, सीसीएमएस मीटर बंद आहे की चालू आहे याची माहिती मोडेमद्वारे विद्युत विभागातील नियंत्रण कक्षाला कळणार आहे.
येथे बसणार सीसीएमएस बॉक्स -
६६ : सातारा शहर
६२ : शाहूपुरी
३१ : विलासपूर
१५ : खेड
०८ : महादरे