सायबर गुन्हेगारीत तक्रारीसाठी 'गोल्डन अवर' महत्वाचा

सायबर फसवणुकीमध्ये विनाविलंब तक्रार द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by Team Satara Today | published on : 04 October 2025


मुंबई : रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने ' गोल्डन अवर' मध्ये उपचार मिळाल्यास अपघात ग्रस्ताचे प्राण वाचू शकतात. त्याच  पद्धतीने सायबर फसवणुकीमध्ये  हा ' गोल्डन अवर' महत्वाचा आहे. जेवढी विनाविलंब तक्रार द्याल, तेवढी फसवणूक झालेली रक्कम  वाचविणे आणि परत आणणे सोयीचे होते. त्यामुळे सायबर फसवणूक झाल्याचे समजल्यास तातडीने विनाविलंब   तक्रार १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन क्रमांकावर  द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सायबर जनजागृती माह ऑक्टोबर २०२५  कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते महाराष्ट्र पोलिस मुख्यालय, कुलाबा येथे झाले.  यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी, व्हिजेटीआयचे डॉ. फारूक काझी, आयआयटी मुंबईचे प्रा.मंजेश हनवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हे टाळणे हेच सर्वात मोठ आव्हान आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा होण्याबरोबरच आर्थिक तोटा टाळणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या (एआय)च्या वापरामुळे फिशिंग, ओटीपी फसवणूक, डीपफेक, आवाज व चेहरा क्लोनिंग अशा नवीन तंत्रांचा गैरवापर करून सामान्य लोकांना फसवले जात आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार, पेमेंट्स यामध्ये आपण माहिती देतो. कुकीज स्वीकारल्यानंतर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. यावरून स्कॅम, एक्स्टॉर्शन, सायबर बुलिंग यासारखे प्रकार घडतात. 

राज्यात जागतिक स्तराची  सायबर सिक्युरिटी लॅब, प्रतिसाद केंद्रे आणि रेग्युलेटरी यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे फसवणुकीनंतर तात्काळ कारवाई करून नुकसान कमी करता येते. मात्र यासाठी वेळेवर तक्रार होणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानच धोका असून त्यावर  तंत्रज्ञानच  उपाय आहे. डीपफेकसारख्या आव्हानांवर  आपली क्षमता वाढते आहे. कोणताही डिजिटल गुन्हा त्याचा डिजिटल फिंगरप्रिंट मागे ठेवतो. त्यामुळे क्षमता आणि जनजागृती दोन्ही समान महत्त्वाची आहेत.  युवकांपर्यंत सायबर सुरक्षिततेबाबत माहिती पोहोचवणे आवश्यक असून, या कार्यात कम्युनिकेटर्सची महत्त्वाची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला म्हणाल्या, आपल्या नागरिकांना सजग ठेवण्यासाठी आणि त्वरित त्यांचे संरक्षण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक उल्लेखनीय जनजागृती मोहीम सुरू केली आहे. देशातील प्रत्येक मोठ्या रेल्वे स्थानकावर दररोज  सायबर सुरक्षा सूचना दिल्या जात आहेत. लाखो नागरिक हे संदेश दररोज त्यांच्या दैनंदिन जीवनात ऐकत आहेत.

राज्य पोलिस यंत्रणाही  जनजागृतीची गरज ओळखून महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सखोल जनजागृती मोहीम राबवत आहे.

यावेळी सायबर सुरक्षा विषयक माहितीपट दाखविण्यात आला. तसेच  'सायबर योद्धा' या लहान मुलांसाठीच्या कॉमिक बुकलेटचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सायबर जनजागृतीसाठी काम करणाऱ्या सायबर वॉरियर चा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी मानले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुचाकी वाहनांसाठी एम एच ५३ डी नवीन मालिका सुरु
पुढील बातमी
मूर्ती विसर्जनावेळी नदीत युवकाचा मृत्यू

संबंधित बातम्या