सातारा : सर्वधर्मीय सण आणि उत्सवांना अधिकाधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून गेली अकरा वर्षे चालणाऱ्या ‘कुर्बानीचे रूप नवे’ या अभियानांतर्गत अंनिस आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सातारा येथे बकरी ईदनिमित्त रक्तदानाने ‘कुर्बानी’चे नवे रूप समाजासमोर मांडले.
अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘अंनिस फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक होळी, पर्यावरणपूरक गणपती अशा अनेक सणांना मानवी चेहरा देण्याच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना सुरुवातीला विरोध झाला; पण आता महाराष्ट्र शासनाने तसेच समाज मनाने देखील हे उपक्रम मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहेत. त्याच पद्धतीने ‘कुर्बानीचे रूप नवे’ या उपक्रमाला देखील वाढता प्रतिसाद मिळत आहे. हे खूप आश्वासक आहे
पैगंबर शेखसारखे तरुण कार्यकर्ते मुस्लिम सुधारणा मंडळामार्फत बोकडाची कुर्बानी देण्याऐवजी आर्थिक कुर्बानी हा उपक्रम राबवत आहेत आणि त्याला चांगला पाठिंबा मिळत आहे. हे चांगले आहे.’’
डॉ. दाभोलकर पुढे म्हणाले, की माणूस हा मिश्रहारी प्राणी असल्याने अंनिस संघटनेचा विरोध हा मांसाहाराला नसून देवाच्या नावाने बळी देणे या संकल्पनेला आहे.
यावेळी दोन्ही संघटनांच्या वतीने २० जणांनी रक्तदान केले. या उपक्रमात मोहसीन शेख, श्रेयंषू माने, प्रवीण माने, शामली माने, प्रशांत पोतदार, उदय चव्हाण, इंद्रजित कदम, डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. प्रदीप झनकर, डॉ. दीपक माने, महादेव इंगळे, शाहरुख शिकलगार, सार्थक पाटील, इंद्रजित कदम आदी लोकांनी सहभाग घेतला. या रक्तदानाचा गरजू लोकांना फायदा होईल, असे विचार माऊली रक्तपेढीचे डॉ. रमण भट्टड यांनी व्यक्त केले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोहसीन शेख आणि वंदना माने यांनी प्रयत्न केले.