सातारा : मराठी साहित्यातील प्रस्थापितांच्या काल्पनिक शब्द कोशापेक्षा वास्तवतावादी जीवन मांडणारे साहित्य पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांची पंतप्रधान श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय सातारा या ठिकाणी मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विशेष मुलाखत घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सद्य परिस्थिती समजून घ्यावी. आपण आणि आपला देश समृद्ध करण्याचे वेड विद्यार्थ्यांना याच काळात लागले पाहिजे. भारताला सुजलाम सुफलाम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत वाचन केले पाहिजे. मोबाईल पासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. माहिती घेण्यापेक्षा ज्ञानी बनण्याचा ध्यास लागला पाहिजे. असे स्पष्ट करून पद्मश्री माने यांनी पुढे सांगितले त्यासाठी चांगल्या ग्रंथांचे वाचन केले पाहिजे . शेतकरीच क्रांती घडवून आणतो. त्याच्या दररोजच्या जगण्यातूनच त्याने साहित्यिक क्रांती केलेली आहे. विविध शब्दांची निर्मिती हे श्रमिकांच्या श्रमातून, शेतात घाम गाळून शेती फुलविणाऱ्या शेत मजुरांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक श्रम करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्यासारखे ज्ञानी, विद्वान व शिक्षणप्रेमी व्हावे.
सातारा या ठिकाणी अनेक वीरांनी, विद्वानांनी, पराक्रमी व शूर महिलांनी इतिहास घडवला. आपण ही स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे झाले पाहिजे. ध्येय घेऊन मुलांनी जगले पाहिजे, केवळ ते ठरवून त्यातच रंगून जाऊ नये तर ते जगावे, साकार करावे. याप्रसंगी त्यांनी सामाजिक समस्या, शैक्षणिक व्यवस्था, साहित्यिक परिस्थिती व सध्याचे राजकारण यावर ही आपल्या मुलाखतीतून विचार व्यक्त केले. त्यांना काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. त्यांना पद्मश्रींनी प्रोत्साहन देत त्यांचे समाधान केले. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी प्रकट मुलाखत मध्ये सडेतोड भाष्य करून आपल्या साहित्यक क्षेत्राची ओळख करून दिली.
पद्मश्री लक्ष्मण माने यांची मुलाखत एकनाथ उत्तम तेलतुंबडे, श्री मनीष आंबेकर व श्री सचिन काळनर या शिक्षकांनी घेतली. सामाजिक विज्ञान विभागाच्याकडून तयार करण्यात आलेल्या भारतीय संविधान वृक्षाचे व ग्रंथालयाचे निरीक्षण पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले. कला शिक्षक श्री प्रशांत हरदास यांनी कार्यक्रमाकरीता सहकार्य केले. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या अँसी ए जे यांनी पद्मश्रींचे स्वागत सत्कार केला. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.