अखेर फडफडणारा दिवा निमाला

फलटणात मिस्टर रामराजेंच्या 3 दशकांच्या राजकारणाचा अस्त

by Team Satara Today | published on : 22 December 2025


सातारा :डॉक्टर, तुम्ही फलटणला येता, कधी तुमच्या गाडीचा अपघात होईल आणि तुमचा मेंदू रस्त्यावर इस्तत पडेल याचा काही नेम नाही. त्यामुळं इथून पुढं फलटणमध्ये पाय ठेवताना दहावेळा विचार करा. हे शब्द होते तत्कालिन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर यांचे आणि समोरील व्यक्ती होते डॉक्टर नंदकुमार तासगावकर.

आज दि. 21 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालात सातारा जिल्ह्यातील फलटण येथील बहुचर्चित अशा फलटण नगरपालिकेचा निकालही दुपारीच लागला. जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील महानुभवांचे लक्ष या निवडणूक निकालावर लागले होते. अर्थात कुस्ती नाईक निंबाळकरांमध्येच होती. परंतु हे जरी नाईक निंबाळकर असले तरी यांच्यामध्ये विस्तव जात नव्हता. कारण यांच्यामध्ये विळ्याभोपळ्याचे वैर होते आणि आहे तेही 2 पिढ्यांपासून. 1995 साली फलटण-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या गिरवीचे सुपूत्र चिमणराव कदमांचा पराभव करुन फलटण संस्थानचे तत्कालिन अधिपती मालोजीराजेंचा नातू असणार्‍या रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांनी सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदमांचा धक्कादायक निसटता पराभव करुन आपली मांड फलटणच्या मतदारसंघावर ठोकली होती. अर्थात याला बारामतीकरांचे पाठबळ होती त्यामुळेच ही किमया शक्य झाली होती. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून फलटणकरांनी आपल्या राजांच्या तिन्हीही निर्विकार चेहर्‍यांना आपल्या हृदयामध्ये स्थान दिले. मात्र, हे स्थानही औटघटकेचेच ठरले. कारण मंत्रीपद मिळताच यांनी लोकांच्या जमिनीवरील सात बार्‍यावर नाईक निंबाळकर ट्रस्ट व नागेश्‍वर देवस्थानचे शिक्के चढवले. परंतु लोकांकडे पर्याय नव्हता. खांद्यावर घेतलेच आहे तर कानामध्ये लघुशंका करेपर्यंत खाली उतरायचेच नाही, असा चंगही मिस्टर रामराजे आणि त्यांच्या दोन्ही भावांनी बांधलेला होता. सुमारे 3 दशके विधानपरिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे कनिष्ठ बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सत्ता उपभोगली. परंतु फलटणचा विकास मात्र झाला नाही. मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील सभेत म्हटले होते, अरे लेकांनो, बारामतीचा अजून किती विकास करायचा, जरा फलटण, इंदापूर आणि दौंडला जावून या म्हणजे तुम्हाला विकास काय असतो हे कळून चुकेल. काही अपवाद सोडल्यास गेली 25 वर्षे मिस्टर रामराजेंनी आणि त्यांच्या दोन्ही बंधूंनी बारामतीच्या पवारांची कास सोडलेली नव्हती. मात्र, राष्ट्रवादीअंतर्गत बंडाळी झाल्यानंतर ज्या शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातून विरोध असतानाही रामराजेंच्या लायकीपेक्षा जास्त झाले, त्याच रामराजेंनी सत्तेपुढे लाचार होवून शरद पवारांचा हात झटकून अजित पवारांचा हात हातात घेतला. हल्ली सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, परंतु कधी-कधी वय झाल्यानंतर मेंदूही काम करायचा बंद होतो. कदाचित अशा काही गोष्टी त्यांच्याबाबत घडल्या असाव्यात. 2012 साली मी सातारा टूडे हा जिल्ह्यातील पहिला ऑनलाईन न्यूजपेपर सुरु केला. सगळं काही अलबेल होतं, पण फलटणमध्ये विचित्र परिस्थिती होती. गुंडगिरीतून पैसा आणि पैशातून राजकारण आणि त्या राजकारणातून पुन्हा गुंडगिरी अशी काहीशी परिस्थिती होती. अर्थात या सगळ्याला राजाश्रय होता. फलटणमधील खाजगी सावकार माजलेले होते. तालुक्यातील साधा एक शेतकरी आपला भाजीचा देठही फलटण शहरात येवून विकू शकत नव्हता. कारण या खाजगी सावकारांना फलटणनरेश म्हणजेच रामराजेंचं पाठबळ होतं. दशकभर पालकमंत्री, त्यानंतर 5-6 वर्षे विधानपरिषदेचे सभापती असल्याने फलटण तालुक्यातील प्रांताधिकारी, डीवायएसपी, तहसिलदार आणि दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सकाळी-सकाळी लक्ष्मीविलास पॅलेसवर त्यांना सॅल्युट मारण्यासाठी हजर असल्याने यांच्याविरोधात आवाज तरी कोण उठवणार? परंतु सातारा टुडेच्या माध्यमातून मी हा विडा उचलला. तालुक्यातील सोशिक, वंचित लोकांना आधार देत सातारा टूडेच्या माध्यमातून त्यांचा आवाज बुलंद केला. मिस्टर रामराजे आणि त्यांच्या दोन्ही बंधूंच्या विरोधात खाजगीतही बोलायला घाबरणारे सातारा टूडेच्या दट्ट्यामुळे चौकाचौकात व्यक्त होवू लागले. गेल्या दीड दशकामध्ये या तिन्ही भावांची सातारा टूडेने हवा काढली. 2019 ला माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर खर्‍या अर्थाने रामराजेंची उलटगिनती सुरु झाली होती. परंतु कधीकधी बुडणार्‍ याला काठीचा आधार असतो त्याप्रमाणे 2019 साली महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यात हे तरुन निघाले. सातारा टूडेच्या लेखणीच्या माध्यमातून आम्ही रामराजेंसह त्यांच्या दोन्ही भावांचा लेखाजोखा मांडून त्यांना दे माय धरणी ठाव करुन सोडले होते. याला फलटणकरच काय पण सातारा जिल्ह्यातील लाखो जनता साक्षीदार आहे. यावर लिहायचे झाले तर पुस्तकच काय पण खंडही पुरणार नाहीत. भविष्यात यावर एखादे पुस्तक आले तर आश्‍चर्य वाटायला नको! तर जिथून सुरुवात झाली तिकडे वळूयात...

डॉ. नंदकुमार यादवराव तासगावकर हे व्यवसायाने डॉक्टर. मुंबईतील दादरमध्ये शिवसेनेचे हेडक्वार्टर असलेल्या सेनाभवनाला लागूनच त्यांची इमारत. तिथे ते रेडीओलॉजिस्ट म्हणून रुग्णसेवा करत होते. रायगडमधील कर्जतमध्येही त्यांचे मोठे शैक्षणिक संकुल आहे. हजारो विद्यार्थी तिथे ज्ञानार्जन करत आहेत. साधारणत: 2007 ते 2008 च्या आसपास त्यांनी फलटण तालुक्यातील बरड गावालगत सुमारे 300 एकरापेक्षा जास्त जमीन खरेदी केली आणि त्या जमिनीवर साखर कारखाना उभारण्याचा परवानाही मिळवला. एव्हाना ही खबर मिस्टर रामराजेंच्या कानावर पोहोचली. कोण कुठला डॉक्टर फलटणमध्ये येतो. 300 एकर जमीन खरेदी करतो आणि वरुन साखर कारखान्याचे लायलन्सही मिळवतो? आणि मला विचारत नाही. या एकाच विचाराने तत्कालिन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या मिस्टर रामराजेंचे पित्त खवळले. जमीन व्यवहाराच्या फाईल्स मागवल्या. पेशाने वकील असल्यामुळे काळ्याचे गोरे आणि गोर्‍याचे काळे कसे करायचे यात यांचा मोठा हातखंडा. तत्कालिन अप्पर जिल्ह्याधिकार्‍यांना सातार्‍यातील सर्किट हाऊसमध्ये बोलावून घेतले आणि तासगावकरांना कसे टांगायचे याचा प्लॅन ठरला. या प्लॅननुसार सिलिंग ऍक्टखाली तासगावकरांना टांगले. आता हे सगळे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. अगदी राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र मिस्टर रामराजेंच्या हट्टापायी हा प्रयत्नही निष्फळ ठरला. ज्या बरडच्या रानमाळावर पावसाळ्यात गवतही उगवत नव्हते अशा जमिनीवरती डॉ. तासगावकरांनी नंदनवन उभे केले होते. महाराष्ट्रातीलच काय पण भारतातील सर्वात मोठे ग्रीन हाऊस म्हणजेच हरितगृह, 5000 गायी म्हैशी सामावू शकतील असा गायींचा आणि म्हशींचा अत्याधुनिक गोठा, दिवसाला 8000 मेट्रीक टन गाळप होईल असा सुसज्ज  साखर कारखान्याची पायाभरणी सुरु केली होती. परंतु सरंजामी डोक्यात भिनलेल्या मिस्टर रामराजेंना स्वत:च्या स्वार्थासाठी हे बघवले नाही. शेवटी फलटणमध्ये तुम्हाला काम करायचे असेल तर 50% भागीदारी दिली पाहिजे आणि तीही एक छदाम न देता. अहो, ही तर एक प्रकारची खंडणीच झाली. पण हातात सत्ता असल्यानंतर आपले कोणी वाकडे करु शकणार नाही, अशा मस्तीत रमणार्‍या रामराजेंचा आज हिशोब चुकता झाला आहे. त्यांचे पानिपत झाले. मागील विधानसभेत त्यांच्या विचाराच्या आमदाराचा पराभव झाला आणि आता सलग फलटणच्या नगरपालिकेतील सत्ताही गेली आहे. फलटणच्या पांढरीमध्ये मस्तवाल लोकांना फारकाळ थारा मिळत नाही. हे वेळोवेळी सिध्द झाले आहे. 14 व्या शतकात उत्तरेतून आलेल्या निंब राजाने फलटणमध्ये स्वत:ची गादी स्थापन केली आणि त्याच निंब राजाचे रामराजे वंशज म्हणून मिरवतात. 2019 साली गमतीने सातारा टूडेच्या माध्यमातून ‘बिर्‍हाड निघालंय पुण्याला’ या मथळ्याखाली एक अर्कचित्र (कार्टून) प्रकाशित करुन फलटण तालुक्यात धमाल उडवून दिली होती. सध्या ते कार्टून पुन्हा एकदा फलटणकरांच्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केले जात आहे. राजाचा पराभव झाला आणि आजतर राजपुत्राचाही झाला. डॉक्टर तासगावकरांचा मेंदू रस्त्यावर इस्तत पाडण्याची धमकी देणार्‍या रामराजेंचे आज नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर पानिपत झाले आहे आणि भविष्यातील राजकारणामध्ये त्यांचा टिकाव लागण्याची शक्यताही धूसर झाली आहे.  गेल्या 30 वर्षाच्या राजकारणामध्ये जिल्ह्याचा बॉस होण्याच्या नादामध्ये मिस्टर रामराजेंनी अनेकांच्या संसाराची राखरांगोळी केली आहे. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे आणि सध्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेही मिस्टर रामराजेपिडीत आहेत, हे जिल्ह्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. गेल्या वर्षी  फलटण विधानसभा निवडणूकीत सत्तांतर झाल्यानंतर रामराजेंचा दिवा फडफडायला लागला होता आणि आज तर तो पूर्णच निमाला म्हणजेच विझला आहे. तूर्तास... एव्हढेच... आजच सगळं काढलं तर म्हातारपणात सोसणार नाही.पुढचं निदानच्या बारीला...

– संग्राम निकाळजे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धेत हणमंत शिंदे मोठ्या गटात तर देवदत्त घोणे छोट्या गटात विजयी

संबंधित बातम्या