सातारा : सातार्यातील आरोग्यसेवा क्षेत्रात ऐतिहासिक घडामोडी घडत असून जिल्हा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या जीएनएम अभ्यासक्रमाचे श्रेणीवर्धन करुन बी. एस्सी. नर्सिंग या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमास यावर्षीपासून सुरुवात होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून 8 हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही संधी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दूरदृष्टीतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून या उपक्रमाला मूर्तस्वरूप मिळाले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्याच जिल्ह्यात गुणवत्ता असलेले शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. जिल्हा रुग्णालयात बी. एस्सी. नर्सिंग या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमामुळे जिल्ह्यातील इच्छुक 40 विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग क्षेत्रातील करिअरचे नवे दालन खुले झाले आहे. शिक्षणासाठी लागणार्या भौतिक व शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, क्लिनिकल ट्रेनिंग व प्रशिक्षित अध्यापक वर्गाच्या माध्यमातून हा कोर्स राष्ट्रीय स्तरावर दर्जा राखणारा ठरणार आहे.
ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी अनेकवेळा मंत्रालयापासून जिल्हा प्रशासनापर्यंत सातत्याने या अभ्यासक्रमासाठी पाठपुरावा केला होता. त्याचं फलित म्हणून आज सातार्यातील जिल्हा रूग्णालयात हा उभ्यासक्रम प्रत्यक्षात राबवला जात आहे. ग्रामीण विद्यार्थिनींना विशेषत: लाभ होणार आहे. बी. एस्सी. नर्सिंगसारखे अभ्यासक्रम बहुधा महानगरांपुरते मर्यादित होते. आता त्याच दर्जाचे नर्सिंग शिक्षण सातार्यात उपलब्ध झाले आहे.
आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध व्यवसायिक संधींची दारे या अभ्यासक्रमामुळे उघडणार आहेत. कोरोना काळानंतर आरोग्यसेवेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात नर्सिंग क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होणे ही एक दूरगामी परिणाम करणारी योजना ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यात नव्याने सुरु होत असलेल्या नर्सिंग कोर्समुळे शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रगती होणार असून शासकीय रुग्णालयांची शैक्षणिक भूमिका अधिक बळकट होईल. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षण संस्था आणि आरोग्यसेवक यांच्यातील सुसंवाद यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाचे शिक्षण मिळणार आहे. नर्सिंग हे केवळ शिक्षण नसून आरोग्य सेवेतील एक नवे पर्व आहे. सातार्यातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.