मुंबई : मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर ५० हून अधिक कार व मालवाहू ट्रकचे टायर एकाच भागात पंक्चर होण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. एका लोखंडी पत्र्यामुळे हा प्रकार घडला असून आधीच टायर फुटून अपघातांची मालिका असलेल्या या एक्स्प्रेसवेच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
समृद्धी महामार्गावर लोखंडाचा पत्रा पडलेला होता. यावरून अनेक वाहने जात होती. हा पत्रा लागून अनेक वाहनांचे टायर फाटले आणि ही घटना घडली. हा प्रकार वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि वनोजा टोल नाका परिसरात घडला आहे. २९ डिसेंबरच्या रात्री १० वाजता यामुळे चारचाकी आणि मालवाहू वाहने ठिकठिकाणी थांबलेली होती. यामुळे हायवेवरही वाहतूक कोंडी झाली होती.
धक्कादायक बाब म्हणजे एक्स्प्रेस हायवे असल्याने आसपास मदतीलाही कोणी नव्हते. भरमसाठ टोल देऊनही कोणी मदतीला येत नव्हते. यामुळे अनेक प्रवासी रात्रभर महामार्गावरच अडकले होते. हा पत्रा अपाघाती पडला की मुद्दामहून फेकण्यात आला याची चौकशी केली जात आहे.
समृद्धीवर सुरुवातीपासून टायर फुटून अनेक भीषण अपघात झालेले आहेत. तसेच लक्झरी बसेसना आगीही लागण्याचे प्रकार घडलेले आहेत. यामुळे आधीच हा महामार्ग जीवघेणा ठरत असताना आता पत्राच रस्त्यावर पडून वाहनांचे टायर पंक्चर झाल्याने व रात्रभर मदतही न मिळाल्याने या महामार्गावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.