सातारा : सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. उडान 5.5 या सी-प्लेन सेवेसाठी सातारा जिल्ह्यातील धोम धरणाच्या जलाशयाची निवड करण्यात आली आहे. महाबळेश्वर, तापोळ्यापाठोपाठ धोम धरण परिसरातही पर्यटन विकासाला यामुळे चालना मिळणार आहे.
जिल्ह्यात सध्या पर्यटन विकासाला चालना देणारे प्रकल्प आकार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यातील धोम धरणात सी-प्लेन सेवा सुरू करण्याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी डिसेंबर 2024 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हवाई वाहतूक मंत्रालयाला निवेदन दिले होते. सातारा लोकसभा मतदारसंघात विकासात्मक पर्यटन रोजगाराची प्रचंड संधी आहे. राज्य शासनाने जावळी तालुक्यातील मुनावळे गावात जलक्रीडा पर्यटन विकास प्रकल्प केला आहे. तसेच शिवसागर जलाशयामध्ये जागतिक स्तरावरील जल पर्यटनाची योजना मंजूर केली आहे. जल पर्यटन विकासाच्या जोडीला सुमारे 90 चौरस किलोमीटर अशा विस्तीर्ण शिवसागर जलाशयात सुमारे वीस चौरस किलोमीटरच्या धोम जलाशयातून उड्डाण किंवा पाण्यावर उतरणारी सी-प्लेन सेवा सुरू केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या उडान 5.5 या योजनेअंतर्गत या उपक्रमाला मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने ही योजना राबवावी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली होती. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उदयनराजे यांच्या या मागणीला यश आले आहे. ही योजना सध्या प्राथमिक टप्प्यात असली तरी निधी उपलब्ध झाल्यानंतर तीन टप्प्यांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. यासाठी उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. आता जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि दुर्गम भागातील स्थानिकांच्या अर्थकारणाला या निमित्ताने चालना मिळणार आहे.