सातारा : जावली तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील मानबिंदू म्हणून प्रतापगड साखर काराखान्याची आोळख आहे. सभासद शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्वर्गिय लालसिंगराव शिंदे यांचे स्वप्न अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु केला आहे. गत वर्षीचा हंगाम आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला आहे. तालुक्यातील शेतकरी आणि कारखान्याचे कामगार यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी प्रतापगडचा आगामी गळीत हंगामही यशस्वी करू, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अजिंक्यतारा- प्रतापगड उद्योग समूहाचे मार्गदर्शक आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सोनगाव ता. जावली येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या सन २०२५- २०२६ च्या गळीत हंगामाच्या पुर्व तयारीसाठी रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्तारा कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे आदी मान्यवरांसह दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अनेक वर्षापासून बंद असलेला प्रतापगड कारखाना आपण दोन वर्षांपासून सुरु केला आहे. मागील गळीत हंगाम आपण सर्वांनी मिळून यशस्वी करून दाखवला. काराखाना सुरळीत चालला तर आगामी काळात उस उत्पादक शेतकरी, कामगार व येथील स्थानिक जनतेचे आर्थिक जीवनमान नक्की उंचावेल. कारखान्यतील कामगारांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, तेही लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न संचालक मंडळ करत आहे. शेजारील कारखान्याच्या तुलनेत आपल्या कारखान्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास अजून थोडा वेळ लागणार आहे, कारखानदारीतील स्पर्धा मोठी असून इतर कारखान्याची आपण लगेच बरोबरी करू शकणार नसलो तरी त्यांच्या बरोबरीने चालण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. आगामी काळात सर्व अडचणी दूर होतील पण त्यासाठी कारखाना पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
अध्यक्ष सैारभ शिंदे म्हणाले, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने व अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योगाच्या माध्यामातून प्रतापगड कारखाना होऊ घातलेला हंगाम यशस्वी करणार आहे. आगामी हंगामाच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कामे जोमाने सूरू आहेत. कारखान्याच्या व्यवस्थापनानाने सूरू केलेल्या उस नोंदीला तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून अंदाजे ७ हजार ३०० हेक्टर ऊसाची नोंद झाली असून आपला कारखाना सुस्थितित चालण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या उसाच्या नोंदी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सातारा आणि जावली तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.