सातारा : हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे चौथे छत्रपती, सातारा नगरीचे संस्थापक श्री. छ. शाहू महाराज (थोरले) यांच्या 275 व्या पुण्यातिथीनिमित्त संगममाहुली येथील समाधीस्थळी मावळा फौंडेशनच्या पुढाकाराने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मावळा फौंडेशनने आयोजित केलेल्या या सोहळ्यात विविध सामाजिक संस्था, जनता सहकारी बँक, आणि सातारकर सहभागी झाले होते. यावेळी पुण्यतिथीबरोबर श्री.छ. शाहू महाराजांचा जयंती सोहळा ही मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय मावळा फौंडेशनच्यावतीने घेण्यात आला.
संगममाहुली येथील समाधीस्थळी झालेल्या अभिवादनास प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख, मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, इतिहास अभ्यासक अजय जाधवराव, राजू शेठ पुरोहित, संग्राम बर्गे आणि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्यावतीने श्री.छ. शाहूमहाराज (थोरले) यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी छत्रपती शाहू महाराज हे अजातशत्रू होते. भारताच्या इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योध्दा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता, मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर त्यांनी महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला. सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले. त्यांचे कार्य फार मोठे असून मावळा फाऊंडेशनने हे कार्य पुढे चालवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रास्ताविकात फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी फाउंडेशनच्या आणि श्री.छ. शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेत सातारा नगरीचे नाव शाहूनगरी असे करावे अशी मागणी केली. सातारा नगरपालिकेचे जे नवीन कार्यालय होत आहे, त्याच्या प्रवेशव्दाराजवळ शाहू महाराजांचा पुतळा बसवावा अशी आग्रही मागणी केली. यावेळी त्यांनी शाहू महाराजांची समाधीचा जीर्णोध्दार करणारे राजू शेठ पुरोहित, अजय जाधवराव आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांचे विशेष आभार मानले. दरवर्षी शाहू महाराजांची पुण्यतिथी आणि जयंती मावळा फाउंडेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी प्रसिद्ध इतिहास तज्ञ अजय जाधवराव यांनी उपस्थितांना शाहू महाराजांचे चरित्र सांगताना त्यांच्या कारकीर्दीत दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांनी बादशाहाची नेमणूक केली तसेच अखंड हिंदुस्थानात मराठेशाहीचा डंका वाजल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ध्येयमंत्राने तर शेवट प्रेरणा मंत्राने झाला. सूत्रसंचालन फाऊंडेशनचे सचिव नंदकुमार सावंत तर आभार अॅड.चंद्रकांत बेबले यांनी मांडले. याप्रसंगी शिरीष चिटणीस, जनता बँकेचे संचालक वजीर नदाफ, जयंत देशपांडे, अंजिक्य गुजर, आर.डी.पाटील, श्रीराम नानल, रंजित साळुंखे, अजित साळुंखे, अमर बेंद्रे, अभिजीत बारटक्के, राजू गोरे, राजेंद्र मोहिते, रवी माने, जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, सनी शिंदे, गुजराथी अर्बनचे व्यवस्थापक सतीश घोरपडे, किरण पवार, सागर पावशे, तुषार महामूलकर, सचिन सावंत, काका देशपांडे, डॉ. यश बेबले, अॅड. राज बेबले, संगम माहुलीची उपसरपंच अविनाश कोळपे, संगम माहुलीचे सर्व ग्रामस्थ, जनता बँक, गुजराथी अर्बनचे सर्व संचालक, कर्मचारी, मावळा फौंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि सातारकर उपस्थित होते.