नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या संघर्षात भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने आपली शक्ती दाखवून दिली. आता भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO चे स्टार क्षेपणास्त्र प्रकल्प तिसऱ्या टप्प्यात पोहोचलंय. या टप्प्यात क्षेपणास्त्र पूर्णपणे तयार झाले असून त्याच्या उड्डाण चाचण्या घेतल्या जातायत. हे स्टार क्षेपणास्त्र हवाई दल, लष्कर आणि नौदलासाठी लक्ष्य सराव करू शकते. स्टार क्षेपणास्त्र स्वस्त असण्यासोबतच ते ब्रह्मोसला पर्याय देखील बनू शकते.
तिसऱ्या टप्प्यात डीआरडीओ इंजिनीअर क्षेपणास्त्राचे सर्व भाग जसे की नेव्हिगेशन सिस्टम, कंट्रोल सिस्टम आणि इंजिन एकत्र करून संपूर्ण क्षेपणास्त्र तयार करतात. मग युद्धासारख्या परिस्थितीत ते अनेक वेळा उडवले जाते. या चाचणीवरून हे क्षेपणास्त्र किती अचूक, प्रभावी आणि विश्वासार्ह आहे हे दिसून येते. चाचणीनंतर क्षेपणास्त्राशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाते आणि नंतर सैन्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यात आणखी सुधारणा केली जाते.
स्टार क्षेपणास्त्र हवेत आणि जमिनीवर असलेल्या उपकरणांसह योग्यरित्या काम करते की नाही याची देखील तपासणी केली जातेय. जर सर्व चाचण्या यशस्वी झाल्या तर डीआरडीओ क्षेपणास्त्राचे मर्यादित उत्पादन सुरू केले जाऊ शकते. ज्याचा वापर लष्कर प्रशिक्षण आणि पुढील चाचणीसाठी केला जाईल. स्टार क्षेपणास्त्र जमिनीवरूनही डागता येते.
स्टार क्षेपणास्त्रात आधुनिक क्षेपणास्त्रांप्रमाणे उच्च वेगाने उड्डाण करण्याची आणि त्यांच्या वर्तनाचे अनुकरण करण्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र ताशी अंदाजे 3,062 किलोमीटर वेगाने उडू शकते. एवढेच नव्हे तर ते वेगाने दिशादेखील बदलू शकते. वेगवेगळ्या मोहिमा आणि आवश्यकतांनुसार त्याची रचना सहजपणे बदलता येते. हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत किंवा हवेतून जमिनीवर हल्ला करण्यास मदत करू शकते. याशिवाय हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडार नष्ट करण्याच्या सरावात देखील उपयुक्त ठरू शकते.