बोगस मतदान व वाढलेली टक्केवारी याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद : पृथ्वीराज चव्हाण

by Team Satara Today | published on : 07 June 2025


कराड : महाराष्ट्राच्या विधानसभेचा जो निकाल लागला तो अनपेक्षित निकाल होता. २०२४ च्या लोकसभा ते विधानसभा निवडणुकी दरम्यानच्या ४-५ महिन्याच्या कालावधीत नवीन मतदार संख्येत लक्षणीय वाढ झालेली आढळून येते. या प्रक्रियेत दुबार, तिबार मतदारांची मतदार यादीत नावे असताना निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. बोगस मतदार वाढीची प्रक्रिया राज्यभर आयोगाने राबविली. तसेच मतदानाच्या आकडेवारीत सुद्धा वाढलेली टक्केवारी बाबत कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडून दिले गेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र निवडणुकीत बोगस मतदान व वाढलेली टक्केवारी बाबत निवडणूक आयोगाची प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

याआधी अनेक निवडणूका आम्ही लढवल्या आहेत. यंत्रणेचा अशाप्रकारे गैरवापर कधीही होत नव्हता. पण सत्तेत आल्यावर भाजपने सर्व सरकारी यंत्रणा सत्तेच्या गुलाम केल्या आहेत. याबाबतच आमचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखातून वस्तुस्थिती मांडली आहे. निवडणूक येतात जातात त्यामध्ये जय-पराजय होत असतो पण निवडणूक प्रक्रियेमध्ये पक्षपातीपणा करून निकाल वळविण्याची चुकीची पद्धत महाराष्ट्र निवडणुकीत पहिल्यांदाच इतिहासात नोंद झाली. राहुल गांधींच्या लेखाने महाराष्ट्र निकालाबाबत पुन्हा एकदा निरीक्षण नोंदविले गेले. EVM बाबत आरोप केला जातो कि, ते काँग्रेसने आणले पण निवडणूक प्रक्रिया सुरळीत तसेच जलद पार पडली जावी याउद्देशाने EVM आणले गेले पण त्या तंत्रज्ञानाचा गैरवापर भाजपकडून सत्ता काबीज करण्यासाठी केला जात आहे हे लोकशाहीला घातक आहे.  

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकार बाबत राज्यात प्रचंड नाराजीचे वातावरण होते, त्यावेळी निकालानंतर बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी आपले विश्लेषण केले आहे कि महायुतीची पीछेहाट होणार अशी परिस्थिती असताना महायुतीचे सरकार आले यावर निरीक्षण नोंदविताना लाडकी बहीण योजना, कामगार विभागाची भांडी वाटप योजना तसेच पैसे वाटप असे साधारण विश्लेषण केले गेले होते पण तरीसुद्धा निवडणूक प्रक्रियेवरच प्रचंड मोठे असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आता दिसत आहे. कारण जे विजयाचे मार्जिन दिसतायत ते कोणत्याही राजकीय विश्लेषणातून समोर येताना दिसत नाहीत.  आम्ही बऱ्याच निवडणुका लढवल्या आहेत, त्यामुळे राबविलेल्या निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण होत आहे. यामुळे निवडणूक निकाल लागल्यापासूनच आम्ही या प्रक्रिये विरोधात आवाज उठवला होता त्याला राहुल गांधींनी व्यापक स्वरूपात मांडल्याने देशभर महाराष्ट्राच्या निकालाची चर्चा होत आहे. एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदार संख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे ते राहुल गांधींनी आपल्या लेखात मांडले आहे.

लेखातील पहिला मुद्दाच राहुल गांधींनी मांडला आहे कि, मॅच फिक्सिंग करता अंपायर फिक्स करावा लागतो आणि तो भाजपने कसा फिक्स केला याबाबत त्यांनी लेखात मांडले आहे. निवडणूक आयुक्त निवडण्याची प्रक्रियाच भाजपने निवडणुकीआधी बदलली होती, त्या प्रक्रियेला आम्ही त्यावेळीसुद्धा विरोध केला होता पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यामुळे अंपायर जर पक्षपाती असेल तर तो न्याय कसा देईल हे सर्वाना ज्ञात आहेच. असेही मत यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.

दुसरा मुद्दा राहुल गांधी यांनी मांडला आहे कि, मतदार संख्येत लोकसभा ते विधानसभा या 4-5 महिन्याच्या कालावधीत एकदम लक्षणीय वाढ झाली आहे, मग हि मते कुठून आली ? तर हि मते निवडणूक आयोगाने नोंदवली ती मते शेजारच्या राज्यातून किंवा शेजारच्या मतदार संघातून समाविष्ट केली गेली असतील. मी माझ्या मतदार संघामध्ये आमची सर्व मतदार यादी तपासली त्यामध्ये किती लोकांची नावे दुबार, तिबार आणि चौथ्यांदा नोंदवली गेली आहेत ते तपासले. एका व्यक्तीने3-4 ठिकाणच्या बूथ वर नाव नोंदविले आणि त्याने मतदान देखील केले पण निवडणूक आयोगाने नवीन नाव नोंदविण्यासाठी जी काळजी घ्यावी लागते असे काही केले नाही, तो मतदार खरंच तिथे राहतो का ? आधीच्या ठिकाणचे नाव कमी केले का? हे काहीही न तपासतामतदार यादीत नाव नोंदविले गेले. एकाच मतदार संघात एकाच व्यक्तीचे नाव 3-4 ठिकाणी नोंदविले गेले. त्या व्यक्तीचे नाव नोंदविल्यानंतर त्याच्याकडे EPIC कार्ड आहे त्याचा फोटो मतदार यादीवर असेल तर त्या व्यक्तीला मतदान करण्यापासून कस कोणी रोखू शकेल? मग यामध्ये चूक कुठे झाली तर निवडणूक आयोगाने संगनमताने हि बोगस नावे अधिकृत समाविष्ट केली गेली. राहुल गांधींच्या मते 12,000 बूथ मध्ये अशी नावे वाढली आहेत आणि त्यामुळे 85 मतदार संघ असे आहेत जिथे भाजपचा याआधी पराभव झाला होता तिथे आता त्यांचा विजय झाला आहे अशी आकडेवारी त्यांनी दिली आहे. पण मुळात यामध्ये मुद्दा काय आहे तर निवडणूक आयोगाने दुबार तिबार नावे नोंदवली जी बोगस आहेत. आमचा आग्रह आहे कि निवडणूक आयोगाने डी डुप्लिकेशन चे सॉफ्टवेअर वापरून महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार संघातील यादी तपासून डबल नाव नोंदविले गेले नाही हे तपासले पाहिजे. निवडणूक आयोगाकडे मोठी आयुधं आहेत त्यांच्याकडे महासंगणक आहेत क्रियाशील कर्मचारी आहेत तर त्यांनी राज्यातील सर्व मतदार संघाची यादी तपासून दुबार-तिबार मतदार शोधून त्यांना तपासून ती नावे काढली पाहिजेत हि जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.

काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षाने या बाबत एक निर्णय घेतला कि, जे उमेदवार पराभूत झाले आहेत त्यांनी आपल्या मतदार संघातील निकाला विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली पाहिजे. जवळपास 100 च्या वर पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे. कारण काही मुद्दे आम्हाला तिथे मांडायचे आहेत. आम्हाला त्यामध्ये न्याय मिळेल असं वाटत नाही कारण निवडणूक याचिकेचा निकाल सरकार कधीही लावू देत नाही. तरी आम्हाला त्याचा फायदा होईल कि नाही माहित नाही. पण निवडणूक प्रक्रिया तरी सुधारेल अशी अपेक्षा आहे. राहुल गांधींनी याबाबत म्हटलेच आहे कि मॅच फिक्सिंग सारखा प्रकार जर होत असेल तर लोकशाहीसाठी हे विषच आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपने चोरली का ? तर राहुल गांधींनी त्यांच्या लेखात स्पष्ट लिहले कि नक्कीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजपने सत्तेचा वापर करून चोरली आहे. राहुल गांधींनी हे विधान महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालाचा आधार देऊन लोकसभेत, विविध सभांमध्ये तसेच परदेश दौऱ्यात सुद्धा केले आहे. निवडणूक याचिका केल्यानंतर त्यावर चर्चा व्हावी जेणेकरून माहिती जनतेसमोर येईल यासाठी स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया राबविता येईल का तसेच याचा निकाल किमान सहा महिन्यात लागेल अशी व्यवस्था होईल का ? याचा विचार झाला पाहिजे. आम्ही केलेल्या याचिकांवर तारखा पडत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू
पुढील बातमी
सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवली शाहूपुरी चौकातील अतिक्रमणे

संबंधित बातम्या