तामिळनाडू (चेन्नई) : साताराच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या खेळाडूंनी तामिळनाडू येथे नुकत्याच पार पडलेल्या 'ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी मल्लखांब स्पर्धा २०२५' मध्ये चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. विद्यापीठाच्या मुलांच्या संघाने या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत एकूण ६ कांस्यपदके जिंकण्याचा विक्रम केला. या अभूतपूर्व यशाच्या बळावर, मुलांचा संघ आता प्रतिष्ठेच्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
मुलींच्या गटात 'रौप्य' पदकाची कमाई याचबरोबर, मुलींच्या गटात विद्यापीठाच्या भक्ती मोरे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळवून २ रौप्य पदके जिंकत आपल्या कामगिरीची छाप पाडली. विद्यापीठा च्या संघाने एकूण 8 पदकांची कामाई केली. संघाचे प्रशिक्षक प्रा. तुषार पोवार आणि संघ व्यवस्थापक प्रा. किशोर संकपाळ यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हे ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या मेहनतीचे आणि अथक परिश्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या दिमाखदार कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, कुलसचिव डॉ. विजय कुंभार, प्रि. डॉ. भारत जाधव, प्रि. डॉ. राजेंद्र मोरे, प्रा. डॉ. गणेश जाधव, सर्व अधिष्ठाता, संचालक, अधिकारी व कर्मचारी यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. उदय शिंदे, प्रा. किशोर संकपाळ आणि प्रा. विक्रमसिंह ननावरे, प्रशिक्षक प्रा. तुषार पोवार यांनी सर्व विजेत्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या या खेळाडूंनी राज्याचा आणि विद्यापीठाचा गौरव राष्ट्रीय स्तरावर वाढवला आहे.