मला आडवे आलेल्यांना जनतेने आडवे केले : ना. जयकुमार गोरे

by Team Satara Today | published on : 02 June 2025


खटाव : जनतेला दिलेल्या शब्दांची व उद्दिष्टांची पूर्ती करत माण-खटावच्या जनतेला दाखवलेली स्वप्ने पूर्ण करत विश्वासार्हता मिळवली आहे. बिजवडीसह उत्तर माणमधील वंचित गावांना जिहे-कटापूर सिंचन योजनेतून पाणी देण्याचा आपण शब्द दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत या कामाला मान्यता आणून दीड महिन्यात टेंडर निघेल अन् येणार्‍या दोन ते अडीच वर्षात या भागात पाणी आणणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री ना.जयकुमार गोरे यांनी केले. दरम्यान, मला आडवे आलेल्यांना जनतेने आडवे केले असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

बिजवडी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सौ.सोनिया गोरे, सिध्दनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरूण गोरे, नगराध्यक्षा सौ. निलम जाधव, अतुल जाधव, सिध्दार्थ गुंडगे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय भोसले, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश भोसले, सरपंच राधिका शिनगारे, उपसरपंच अमित भोसले, संदीप भोसले, विविध गावचे सरपंच, चेअरमन, पदाधिकारी, चैतन्य पतसंस्थेचे चेअरमन पदाधिकारी उपस्थित होते.

ना. जयकुमार गोरे म्हणाले, आज विरोधी पक्षातील लोकांनाही माण-खटावचा पाणीप्रश्न जयकुमार गोरेच सोडवू शकतात हा विश्वास वाटू लागला आहे. जनतेची हीच विश्वासार्हता आपण जपली आहे. अनेकजण म्हणत होते कि जयकुमार आमदार होणार नाही. नंतर म्हटले याला कुठल मंत्रीपद मिळतय पण जनतेच्या विश्वासावर चौथ्यांदा आमदारही झालो अन् मंत्री ही झालोय. आपल्या नितिमत्तेत कधी खोट नव्हती. त्यामुळे आजपर्यंत आपल्याला आडवे आलेले स्वत: आडवे झालेत. आपल्या मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही जयाभाऊ तुम्ही आम्हाला पाण्याचा शब्द द्या आमचा तुमच्यावर विश्वास आहे, असे म्हणत आहेत. 

एवढी विश्वासार्हता आपण जपली आहे. मतदारसंघात रस्त्याच्या अनेक अडचणी होत्या. शंभर टक्के रस्त्यांचे जाळे तयार करत गावे एकमेकांना जोडली आहेत. सिंचन योजनांतून मतदारसंघात चारमाही पाणी मिळणार आहे. मात्र ते पाणी आठमाही करण्यासाठी सोळशी धरणाचे काम होणे गरजेचे आहे. त्यासाठीही आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एम. के. भोसले आणि संजय भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यभरातून पंढरपुरच्या वारीसाठी 2 हजार नवीन बस धावणार

संबंधित बातम्या