मुंबई : खंडणी प्रकरणावरून बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातील संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे काही फोटो समोर आले आहेत. ते व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज विधीमंडळ सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधीच धनंजय मुंडे यांनी स्वत: न येता आपल्या पीए प्रशांत जोशीद्वारे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पाठवला.
”धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. मुंडे यांचा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यांना मंत्रिपदाच्या कार्यभारातून मुक्त केले आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर काल संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल आदी उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. धनंजय मुंडेदेखील या बैठकीसाठी उपस्थित असल्याचे म्हटले जात आहे. जवळपास दीड ते दोन तास ही बैठक सुरू होती. धनंजय मुंडे यांचा राजीनामा रात्रीच लिहून घेतला असल्याची चर्चा आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. यामध्ये परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप आहे. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडसह मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार यांना अटक करण्यात करून त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला.
काल दिवसभरात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात एकच संतापाची लाट उसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुडे यांना थेट राजीनामा देण्यास सांगितले. आज, मंगळवारी राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.