सातारा : डोंगरी महोत्सवाचे 2 ते 6 एप्रिल या कालावधीत दौलतनगर (मरळी) या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने विविध विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्या जबाबदाऱ्या चोख पार पाडून व सन्मवयातून डोंगरी महोत्सव यशस्वी करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
डोंगरी महोत्सवाच्या अनुषंगाने मरळी येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोनपे, तहसीलदार अनंत गुरव आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भजन, बॅण्ड, पोवाडे, लावणी स्पर्धा, तसेच फूड स्टॉल व फनफेअर यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रांताधिकारी यांनी सन्मवय नेमावेत. डोंगरी महोत्सव कालावधीत मरळी परिसरत स्वच्छ राहील यावर भर द्यावा. चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. महोत्सवाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासाठी ज्यादा एसटीच्या बसेस सोडाव्यात, असेही निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमांच्या आयोजनासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचीही पाहणी करण्यात आली. भजन, बॅण्ड, पोवाडे, लावणी स्पर्धा, तसेच फूड स्टॉल व फनफेअर परिसराची रचना सुयोग्य पद्धतीने करावी, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित व आनंददायी वातावरणात कार्यक्रमांचा लाभ घेता येईल. तसेच महोत्सवाच्या मुख्य मैदानासह कृषी, पशुपक्षी व महिला बचत गटांच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याच्या जागेची पाहणी यावेळी करण्यात आली.