सोलापूर : राज्यात दररोज आत्महत्या होत आहेत. भोंदू बाबांचे पीक जोमात वाढत आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. आत्महत्या करत आहेत. गोरगरिबांचे कल्याण करू असे म्हणणाऱ्या या सरकारच्या प्रत्येक योजना वांज ठरत आहेत, असा घणाघाती आरोप संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला.
कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड आयोजित तिसरे राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलनाचे उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते.
डॉ. सबनीस यांनी पुढे सांगितले की, “शेतकरी आज हवालदिल झाला असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. समाजातील अज्ञानाचा फायदा घेत भोंदू बाबांचे पीक जोमात वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचत नाही,” अशी टीका त्यांनी केली.
"कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संत गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले. आणि शिक्षणाची गंगोत्री समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविली. कर्मवीरांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक महापुरुषांचे विचार एकवटलेले दिसून येतात", असे गौरव उद्गार त्यांनी यावेळी काढले.
यावेळी व्यासपीठावर उद्घाटक माधव गादेकर, माजी आ. बब्रुवान खंदाडे, अध्यक्ष बी आर कलवले, स्वागताध्यक्ष लक्ष्मण कारले, सौ ललिता सबनीस, सत्कारमूर्ती कुमार करजगी, डॉ. ऋत्विक जयकर, दिगंबर ढेपे, संयोजक पत्रकार भरतकुमार मोरे ,महापौर नलिनी चंदिले, प्रा. भीमाशंकर बिराजदार, विजयकुमार कांबळे, श्रीकांत बोराडे. यांची उपस्थिती होती. प्रारंभी संयोजक भारतकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले.