सातारा : ऑपरेशन सिंदूर या लष्कराच्या मोहिमेचे वस्तुस्थिती करणारे कथन करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन सांगावे तसेच जगातील एकही देश आपल्या मागे का नाही, याचे उत्तर पंतप्रधान मोदी व परराष्ट्र मंत्री यांनी द्यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातार्यातील पत्रकार परिषदेत केली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी येथील कॉंग्रेस कमिटी मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, युद्ध करण्यापूर्वी पाकिस्तानला पूर्व सूचना दिली होती का? त्यामुळे त्यांना तयारी करण्यास वेळ मिळाला का, याचाही खुलासा परराष्ट्रमंत्री यांनी करावा, अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, ऑपरेशन सिंदूर मधील सैन्य दलाच्या यशाबद्दल जिल्हा कॉंग्रेसने आज सातार्यात जय हिंद यात्रा यात्रा काढली होती. तसेच भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 34 व्या पुण्यतिथी निमित्त हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिक व शहीद सैनिकांना कॉंग्रेस भवनात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
ऑपरेशन सिंदूरच्या सैन्य दलाच्या कामगिरीबाबत कॉंग्रेस सह सर्व विरोधी पक्षांचा सरकारला पहिल्यापासून पाठिंबा होता. पण याबाबत नेमके काय झाले, याची माहिती केंद्रीय नेतृत्वाने सर्व देशाला विश्वासात घेऊन दिली पाहिजे व संसदेचे याबाबत विशेष अधिवेशन झाले पाहिजे, अशी आग्रहपूर्वक मागणी चव्हाण यांनी केली. तत्कालीन पंतप्रधानांनी युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये वेळोवेळी संसदेच्या अधिवेशनामध्ये माहिती दिलेली आहे. कोणत्याही पंतप्रधानांनी अशी माहिती लपवलेली नाही. या प्रकारे अधिवेशन घेऊन माहिती देणे देश व लष्कराचे मनोधैर्य वाढवते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देऊन लष्कराचा मान सन्मान राखायला हवा. मात्र, असे काही होताना दिसत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून सर्वपक्षीयांचा आणि सैन्याचा विश्वास संपादन करावा.
चव्हाण पुढे म्हणाले, युद्धाबाबत पाकिस्तान सरकारला पूर्व सूचना दिली होती का? जेणेकरून त्यांना तयारी करण्यास वेळ मिळाला? याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे. याबाबत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये भारताची सहा विमाने पाडली, अशी चर्चा होते. हे परराष्ट्र मंत्रालयाचे अपयश आहे. आपला विजय होऊनही जगातील एकही देश आपल्या मागे का नाही, याचे उत्तर पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्रमंत्री यांनी द्यावे. युद्धबंदी ही अमेरिकेच्या दबाखाली झाली का ? याचेही उत्तर मिळावे. त्या चार आतंकवाद्यांचे काय झाले ? अमेरिकेने जर ओसामा बिन लादेनला घरात घुसून मारले तर आपण काय केले? जिंकलेले युद्ध आपण का थांबवले? पाकव्याप्त काश्मिरबाबत मोदी शांत का? युद्धामध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यात काही देवाण-घेवाण झाली का, याचेही उत्तर त्यांनी द्यावे. एकूणच परिस्थितीबाबत विदेश मंत्री जयशंकर यांचे नेतृत्व शंकास्पद असून यावर पंतप्रधान काही बोलायला तयार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस पूर्ण तयारीनिशी उतरणार असून त्याची तयारी आम्ही केलेली आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढायचे की स्वतंत्र याचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीत होईल. तसेच कॉंग्रेस पदाधिकार्यांच्या बदला संदर्भात बोलताना ते म्हणाले, याबाबतचा निर्णय प्रदेश कार्यकारणी व पक्षश्रेष्ठी घेतील.