सातारा : सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधित्व करणारी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या मागण्या मान्य होण्यासाठी बांधवांनी पुन्हा येथील आरटीओ चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, उपाध्यक्ष शैलेश बोर्डे, दिव्यांग फाउंडेशन चे नामदेव इंगळे, अविनाश कुलकर्णी आदी आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
दिव्यांगांना संजय गांधी पेन्शन योजना अंतर्गत सहा हजार रुपये मिळावेत, दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी 274 स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी, त्यांना संपूर्ण शिक्षण मोफत मिळावे, दिव्यांगांसाठी प्रतिवर्षी 30 लाख रुपये निधी खर्च करावा,सर्व बँक शासकीय कार्यालय येथे दिव्यांगांसाठी रॅम्प बनवण्यात यावा, अंत्योदय व दारिद्य्ररेषेखालील यादीतील दिव्यांगांना सरसकट 35 किलो धान्याचे वितरण करावे, या मागण्यांसाठी टोकाचे आंदोलन करण्याचा इशारा सदस्यांनी दिला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही अन्नग्रहण करणार नाही, असा पवित्रा या दिव्यांग बांधवांनी घेतला आहे.