पर्यटकांना पर्यटनासाठी बंदी नाही, मात्र पर्यटनाचा आनंद घेताना अपघात होणार नाही याची काळजी घ्या : जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 20 June 2025


सातारा : सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने संपन्न जिल्हा असल्याने जिल्ह्यात पर्यटनासाठी येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा येणार्‍या पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी तेथे कोणत्याही स्वरूपाची बंदी नाही. तथापि सुरक्षिततेच्यादृष्टीने प्रशासनाकडून आचारसंहिता घालून देण्यात आली आहे. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेत असतानाच अपघात होणार नाही; पर्यटन जीवावर बेतणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यात प्रत्येक ऋतूत पर्यटकांना साद घालणारा जिल्हा आहे. अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली, पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळ, व धरणे अशा पर्यटन स्थळांच्या परीसरात राज्यभरातून येणार्‍या पर्यटकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी  जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. पर्यटकांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणार्‍या नागरीकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता मार्गदर्शक सूचना करताना प्रशासनाने पुढील बाबींवर निर्बंध घातले आहेत. यामध्ये


1) पावसामुळे वेगाने वाहणार्‍या पाण्यात उतरणे व पोहणे.


2) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.


3) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे धबधबे, दर्‍यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणेस व कोणत्याही स्वरुपाचे चित्रिकरण करणे.


4) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्यांचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.


5) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.


6) वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल असे वेगाने चालविणे.


7) वाहनांची ने-आण करतांना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.


8) सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे.


9) सार्वजनिक ठिकाणी येणार्‍या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिल हावभाव करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.


10) सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टम वाजविणे, वाहनातील स्पिकर/उफर मोठ्या आवाजात वाजविणे यामुळे ध्वनी प्रदुषण करणे.


11) ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.


12) धबधबे, धरणे व नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करणे (अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळून)


सदरची मार्गदर्शक आचारसंहिता ही पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी असून पर्यटनाचा आनंद घेत असताना कोणतीही दुखापत, इजा होणार नाही अथवा पर्यटन जीवावर बेतणार नाही, याची दक्षता घ्या, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


हे निर्बंध दिनांक 20 जून ते 19 ऑगस्ट पर्यंत लागू राहतील. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पावसाळ्यात काही भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक
पुढील बातमी
जयकुमार गोरे खंडणी प्रकरणी दिल्लीतून मांत्रिकाला अटक

संबंधित बातम्या