सातारा : समाजातील दिव्यांग बंधू आणि भगिनींना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. माझ्याकडे येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची समस्या सोडवण्याचा मी कायम प्रामाणिक प्रयत्न केला आहे. दिव्यांगांचेही विविध प्रश्न सातत्याने मार्गी लावले आहेत. दिव्यांग बंधू- भगिनींच्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्राधान्य दिले असून आगामी काळात त्यांच्यासाठी व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असा शब्द श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
'सुरुची' कार्यालय येथे दिव्यांगांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी,सदस्य आणि दिव्यांग बंधू- भगिनींनी विविध समस्यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अविनाश कदम, बाळासाहेब खंदारे, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश गाडे, विक्रम पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सातारा- जावली मतदारसंघासह आसपासच्या तालुक्यातील दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी समाजातील प्रत्येक घटकाशी जोडला गेलेलो आहे. माझ्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत मी कधीही दिव्यांग बंधू- भगिनींना दूर ठेवले नाही किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यात कधीही टाळाटाळ केली नाही. हरप्रकारे प्रत्येकाला मदत करून त्यांचे प्रश्न सोडवले आहेत आणि कायम सोडवत राहणार आहे. दिव्यांग हाही समाजातील एक महत्वाचा घटक आहे. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे. याशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील प्रत्येकाने त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. आगामी काळात दिव्यांगांना वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी लक्ष घालून त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.