संमेलनासाठी माझे 99 रुपये; मी 999 रुपये देणार

विद्यार्थी, नोकरदार, सर्वसामान्यांना खारीचा वाटा उचलण्याची संधी

by Team Satara Today | published on : 19 June 2025


सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्‍यात होत आहे. हे संमेलन ‘न भूतो...न भविष्यती’ करण्यासाठी सातारकरांनी वज्रमूठ बांधली आहे. हा संमेलन सोहळा, साहित्योत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय, खासगी नोकरदारांसह सर्वसामान्य जिल्हावासीयांसाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे म्हणून कमीत कमी 99 रुपये, तर नोकरदार, सर्वसामान्यांनी किमान 999 रुपये देवून संमेलन यशस्वी करण्यासाठी संमेलनाचे हिस्सेदार व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा व मावळा फाऊंडेशनने केले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सवच असतो. सातारा शहरात यंदा 99 वे संमेलन होणार आहे. त्याबाबतचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जाहीर केला आहे. त्यामुळे सातार्‍यात साहित्यप्रेमींसह सातारावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सातारा जिल्ह्यात यापूर्वी अपूर्व उत्साहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली. यात सर्वसामान्य सातारकरांपासून ते सर्वच स्तरातील सातारकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत संमेलने दिमाखात पार पाडली. 1 रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत सातारकरांनी देणगी देवून साहित्याचा सोहळा साजरा केला आहे.

यंदाही 99 वे साहित्य संमेलन सातार्‍याला मिळाले आहे. हे ‘न भूतो...न भविष्यती’ होण्यासाठी प्रत्येक सातारकराचा सहभाग अत्यंत आवश्यक आहेत. संमेलनाला आर्थिक हातभार लावून हे संमेलन अलौकिक करण्याची संधी सर्वच सातारकरांसाठी चालून आली आहे. शासकीय, निमशासकीय, खासगी, सहकारी, बँकिंग, औद्योगिक व्यवस्थापनातील अधिकारी, नोकरदार, कर्मचार्‍यांसह शिक्षक, साहित्यिक, साहित्यप्रेमी, सर्वसामान्य सातारकरांनी किमान 999 रुपये तर जास्तीत जास्त कितीही निधी संमेलनासाठी देणगी म्हणून दिल्यास संमेलन नेटकेपणाने साजरे करता येईल.

विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी वाढणे आवश्यकच आहे. विद्यार्थ्यांचाही वाटा या संमेलनात असणे तितकेच गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी खाऊसाठी दिलेले पैसे वाचवून किमान 99 रुपये तर जास्तीत जास्त कितीही रुपये संमेलनासाठी देणगी स्वरुपात द्यावे. स्वत:चा आर्थिक हातभार संमेलनास लाभणे हे सातारवासियांसाठी अभिमानास्पद बाब ठरणारी आहे.


‘99- 999’... हे का?

साहित्याचा सोहळा सातार्‍याच्या भूमीत होत आहे. सातारा ही क्रांतिवीर, शूरविरांची भूमी आहे. सातार्‍याने अनेक संत, साहित्यिक देशाला, महाराष्ट्राला दिले आहेत. सातार्‍यातील 99 वे संमेलन न भूतो..न भविषयतो होण्यासाठी प्रत्येक जिल्हावासीयांचा त्यात सहभाग हवाच. संमेलनाला उपस्थिती राहणे, हा आपला अधिकारच आहे, तर संमेलन नेटकेपणाने करणारे हे आपले कर्तव्य आहे. यासाठीच ही संकल्पना मांडली आहे.


देणगी स्विकारण्याची ठिकाणे...

जनता सहकारी बँक, साताराच्या सातारा शहरातील राजपथ, समर्थ मंदिर, शाहूपुरी, पोवई नाका, मंगळवार तळे, सदरबझार, देगाव फाटा येथील तसेच जिल्ह्यातील वाई, भुईंज, लोणंद, वडूथ, नागठाणे (ता. सातारा), वडूज, रहिमतपूर, मेढा, कोरेगाव येथील शाखा तसेच दि गुजराथी अर्बन को- ऑपरेटीव्ह सोसायटीच्या देवी चौक, शाहूपुरी, शाहूनगर येथील शाखांमध्ये आणि सातारा येथील नगर वाचनालयात देणगी स्विकारली जाईल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत (9422604509) यांच्याशी संपर्क साधावा.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारावासियांसाठी अभिमानास्पद ठरणार आहे. यात सर्वांचा वाटा आसावा. विद्यार्थी तसेच नोकरदार, सर्वसामान्य सातारकरांसाठी ही पहिली निधी योजना जाहीर केली आहे. लवकरच स्वागत समिती सदस्य, लहान मोठे उद्योजक, व्यावसायिक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासाठी निधी योजना जाहीर केल्या जातील.

- नंदकुमार सावंत

- अध्यक्ष, शाहूपुरी शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचे थैमान
पुढील बातमी
पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त वाहतुकीमध्ये बदल

संबंधित बातम्या