सातारा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सातारा शहरातून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात भव्य समता दिंडी काढण्यात आली. समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी या दिंडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
दिंडीच्या सुरुवातीला छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे उपस्थित मान्यवरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर समता दिंडीला उत्साहात सुरुवात झाली. या दिंडीमध्ये सातारा शहरातील विविध विद्यालयांतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अत्यंत उत्कृष्टरित्या संचलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या समता दिंडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग आणि विविध विकास महामंडळांच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणारे फलकांचा समावेश करण्यात आला होता. या फलकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विविध शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तेथेच या समता दिंडीचा समारोप झाला.
याप्रसंगी समाज कल्याण अधिकारी श्रोती रकटे यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे व विकास महामंडळांचे अधिकारी, कर्मचारी आणि सातारा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.