सातारा : उंब्रज सायकल रायडर्स ग्रुपच्या पुढाकाराने आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या उंब्रज ते पंढरपूर सायकल वारीचे शनिवारी सकाळी प्रस्थान झाले. दहा-बारा वर्षांपासून ६५ वर्षापर्यंतच्या जवळपास ३५ सायकलपटूंनी या वारीत सहभाग घेतला आहे.
पर्यावरण रक्षण, वृक्ष संवर्धन, प्रदूषण नियंत्रण, निरामय आरोग्य त्याचप्रमाणे सामाजिक बंधूभाव याचा संदेश देण्याच्या उद्देशाने या सायकलवारीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल वारीत उंब्रज, मसूर, शिरवडे, कराड त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातीलही सायकल रायडर्स उत्साहाने सहभागी झाले आहेत.
शनिवारी सकाळी उंब्रजमधून सायकलवारीचे पंढरपूरसाठी प्रस्थान झाले. मसूर येथे सायकलपटू हर्षल चेणगे यांच्या निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम होऊन ही वारी सळसळत्या उत्साहाने पुढे मार्गस्थ झाली. मसूर, शामगाव, पारगाव, जयराम स्वामी वडगाव, रहाटणी, शेणवडी, होळीचा गाव, निमसोड, मोराळे, मायणी, तरसवाडी घाट, दिघंची, महूद बुद्रुक या मार्गाने ही सायकलवारी पंढरपूरला पोहोचणार आहे.
पंढरपूर येथे आयोजित केलेल्या चौथ्या अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी आणि संमेलनात हे सर्व सायकल पटू सहभागी होणार आहेत. या सायकल वारीत सचिन निकम, शार्दुल निकम, विकास साळुंखे, नामदेव जगदाळे, बाजीराव जगदाळे, हर्षल चेणगे, निखिल निकम, ज्ञानेश कुलकर्णी, शंकर चव्हाण, गौरव कारंडे, संतोष बाबर, मंगेश थोरात, प्रशांत निकम, विशाल भोसले, चंद्रकांत जगताप, सागर तोडकर, शंभूराज जाधव, रोहित पोळ, प्रथमेश पाटील, पाटील सर (तारळे) आदी विविध वयोगटातील रायडर्स सहभागी झाले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.