शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईसाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार

आमदार शशिकांत शिंदे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

by Team Satara Today | published on : 03 June 2025


सातारा : राज्य शासनाने अवकाळी पावसाच्या तडाख्याने झालेल्या नुकसानी संदर्भात अद्याप कोणतीही भरपाई दिलेली नाही. यावेळी सरकारने दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्याचे निश्चित केले आहे, हा निकष अन्यायकारक आहे. शेतकर्‍याला हेक्टरी 50 हजार रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी आम्ही येत्या पावसाळ्या अधिवेशनात करून याबाबत आवाज उठवणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार विरोधी पक्षनेते शशिकांत शिंदे यांनी दिली.

येथील राष्ट्रवादी भवनामध्ये शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, अर्चना देशमुख, भारती काळंगे, राजकुमार पाटील, विजयराव बोबडे, गोरखनाथ नलावडे इत्यादी उपस्थित होते.

आमदार शिंदे पुढे म्हणाले, मागील वर्षी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची व पिक विमा रक्कम आजही मिळालेली नाही. मागच्या मे महिन्यामध्ये जिल्ह्यात अवकाळी जोरदार पाऊस झाला. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. शासनाने भरपाई देण्यासाठी तयार केलेले निकष अन्याय करणारे नसावेत तसेच भरपाई तातडीने मिळण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. तरीही मंत्र्यांची आणि आमदारांची भाषा योग्य पद्धतीने दिसत नाही. आमच्या मते शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजाराची मदत मिळायला हवी. जिल्ह्यातील पंचनामे कशा पद्धतीने झालेत, याची माहिती आम्ही जिल्हाधिकार्‍यांकडून घेणार आहोत. पंचनामे पूर्ण झालेत का, किती दिवसात रक्कम मिळणार, हे शासनाने जाहीर करायला हवे, अशीही मागणी त्यांनी केली.

धोम कालव्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर पन्नास कोटी रुपये मंजूर केले होते. त्यातून किती दुरुस्ती झाली, हे स्पष्ट केलेले नाही. या विरोधात आम्ही अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहोत व शेतकर्‍यांना भरपाई देण्याकरता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.

आगामी सर्व निवडणुका ताकतीने लढणार
जिल्ह्यात पक्ष संघटनेची पुनर्बांधणी केली जाणार आहे. नुकत्याच चार तालुक्यांचे दौरे पूर्ण केले असून शशिकांत शिंदे म्हणाले, सर्व जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना घेऊन संघटन बांधणी करणार आहोत. जूनमध्ये सर्व पदाधिकार्‍यांच्या निवडी होतील. आगामी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सहभागी होऊन ताकतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाईल. महाविकास आघाडी होणे न होणे याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. तरीसुद्धा आम्ही आमची ताकद दाखवणारच, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आता डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती
पुढील बातमी
खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाची सातारमध्ये होळी

संबंधित बातम्या