परमाळे परिसरातील मंडपघळ पर्यटनस्थळाचा विद्रूप चेहरा; दारू पार्ट्या, कचऱ्याचा विळखा आणि प्रशासनाची उदासीनता

by Team Satara Today | published on : 16 June 2026


सातारा : सातारा जिल्ह्यातील परमाळे परिसरातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य मंडपघळ या प्रसिद्ध पर्यटनस्थळाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या प्राचीन वारसा स्थळाचे पावित्र्य धोक्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे. पर्यटनस्थळाच्या परिसरात कथितपणे सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांमुळे येथे मोठ्या प्रमाणात कचरा, मद्याच्या बाटल्या आणि अस्वच्छता पसरल्याचे चित्र समोर आले आहे.

मंडपघळ ही केवळ एक नैसर्गिक गुहा नसून स्थानिक इतिहास आणि लोकपरंपरेशी जोडलेले महत्त्वाचे स्थळ मानले जाते. सज्जनगडाशी पाण्यामार्गे जोडलेली असल्याची लोकश्रद्धा असल्याने तसेच येथील शांत, थंड आणि निसर्गसंपन्न वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक येथे भेट देतात. मात्र, अलीकडच्या काळात या ठिकाणाचा वापर मौजमजा आणि मद्यपानासाठी होत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून परिसरात व्यावसायिक स्वरूपाचे उपक्रम सुरू झाले आहेत. मात्र, संबंधितांकडून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाची कोणतीही जबाबदारी घेतली जात नसल्याचा आरोप आहे. परिणामी गुहेच्या परिसरात प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या, मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि इतर टाकाऊ साहित्याचा ढीग साचत असल्याचे दिसून येत आहे.

"पर्यटनाच्या नावाखाली पैसा कमावण्याचा उद्योग सुरू आहे; मात्र या प्राचीन स्थळाच्या जतनाची कोणालाही पर्वा नाही. निसर्ग आणि इतिहासाचा वारसा जपण्याऐवजी त्याची अक्षरशः विटंबना केली जात आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, मंडपघळसारख्या संवेदनशील पर्यटनस्थळी कोणतेही नियंत्रण नसल्याने दारू पार्ट्या आणि असामाजिक प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जाते. स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन, वन विभाग आणि पर्यटन विभागाने तातडीने हस्तक्षेप करून मंडपघळ परिसरातील अतिक्रमण, अस्वच्छता आणि बेकायदेशीर प्रकारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा साताऱ्याच्या या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा स्थळाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

"पर्यटन विकासाच्या नावाखाली वारशाचा विनाश थांबवा; मंडपघळ वाचवा," अशी आर्त हाक आता स्थानिक नागरिकांकडून दिली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा निर्णय ‘हायकमांड’वर; स्थानिक नेत्यांकडून एकमुखी पाठिंबा
पुढील बातमी
धोम डाव्या कालव्यात तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक; १८ जूनला जलसिंचन कार्यालयावर मोर्चाचा इशारा

संबंधित बातम्या