सातारा : मत्त्यापूर (ता. सातारा) येथील प्रगतशील शेतकरी रविंद्र आबाजी घोरपडे यांच्या मालकीच्या बरड नावच्या शिवारात ऊसाच्या शेतात एका बिबट्याचा मृतदेह मिळून आला असुन साधारणपणे त्याचा तीन ते चार दिवसापुर्वी मृत्यू झाला असावा अशी माहिती मिळत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, रविंद्र घोरपडे यांचे बरडीतील शेत निसराळे गावच्या हद्दीवर आहे. त्या शेतात ऊस तोडीचे काम गेले चार दिवस झाले चालू आहे. आज दि. १२ रोजी ऊसतोड सुरु असताना शेताच्या दुसऱ्या टोकाकडे अडचणीच्या ठिकाणी हा मृत बिबटया आढळून आला. याची माहिती वनक्षेत्रपाल संदीप जोपळे, वन कर्मचारी अभिजित कुंभार यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटनास्थळी भेट दिली. मृत बिबट्या मादी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावरून बिबटयाचा मृत्यू नैसर्गिक आहे की शिकारीच्या उद्देशाने केलेला आहे हे शवविच्छेदनानंतरच समजुन येणार आहे.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सातारा येथे नेण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे. या घटनेबाबत कुणाला काही माहिती असेल तर सातारा वनविभागास कळवावे. कळवणाराचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.