रसायनी : मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर पोलिसांच्या वाहनांचा मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. देशात अनधिकृत वास्तव्य करणार्या बांगलादेशींना पुणे या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तब्बल 19 पोलीस वाहनांचा ताफा निघाला होता. पोलिसांचा हा ताफा रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान बोगद्यात आला असता, त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या 19 वाहनात एकूण तब्बल 160 बांगलादेशी होते. विशेष म्हणजे या अपघाताबाबत अभिनेता किरण माने यांनी ही सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेसवर भातान बोगद्यात आरोपींनी भरलेल्या भरगच्च वाहनांचा सकाळी 7.46 वाजता विचित्र अपघात झाला. बोगद्यातून वाहनांचा प्रवास सुरू असताना पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील जवळपास सहा ते सात वाहने एकमेकांनी धडकली. त्यात 19 पोलीस कर्मचारी आणि 12 बांगलादेशी कैदी असे एकूण 31 जण जखमी झाले असून जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे. तर, अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त गाड्या बाजूला हटवण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांची कर्मचारी विजय माने हे गंभीर जखमी आहेत, ज्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत 6 वाहने अपघातग्रस्त झाली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.