कराडमध्ये वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्षानिमित्त सामूहिक गायन व सायबर जनजागृती रॅली उत्साहात

by Team Satara Today | published on : 12 August 2026


कराड : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर हर घर तिरंगा अभियान, नशामुक्ती अभियान, तसेच राष्ट्रगीत वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षानिमित्त सायबर पोलीस स्टेशन, सातारा व सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत एस.जी.एम. कॉलेज, सैदापूर कॅनॉल परिसर ते वेणूताई चव्हाण कॉलेज या मार्गावर भव्य हर घर तिरंगा, नशामुक्ती व सायबर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये एस.जी.एम. कॉलेजचे सुमारे 700 विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व शिक्षकवृंद मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम्, हर घर तिरंगा तसेच नशामुक्ती आणि सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करणार्‍या घोषणा देत नागरिकांमध्ये देशभक्ती, व्यसनमुक्ती आणि सायबर सुरक्षेबाबत जनजागृती केली.

यावेळी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सामूहिकरित्या वंदे मातरम् गीताचे गायन करून राष्ट्रभक्तीची भावना व्यक्त केली.

रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक व एपीके फाईल, ओटीपी शेअरिंग, डिजिटल अरेस्ट, सोशल मीडिया फसवणूक, ऑनलाइन गुंतवणूक व ट्रेडिंग फ्रॉड, बनावट केवायसी संदेश तसेच सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वतः सायबर सुरक्षित राहण्याबरोबरच आपल्या कुटुंबीयांना व समाजातील नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्याचे आवाहन करण्यात आले.

या संपूर्ण उपक्रमामध्ये सायबर पोलीस स्टेशन, सातारा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी, तसेच पोलीस कॉन्स्टेबल घाडगे, भास्करवाड व कचरे यांनी सक्रिय सहभाग घेऊन सायबर जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचविला. त्यासोबत कराड वाहतूक विभागाचे सपोनी संदीप साळुंखे व त्यांच्या स्टाफने वाहतूक नियमाचे काम केले.

तसेच सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य खिलारे सर, उपप्राचार्य पाटील सर, महाजन सर व सर्व शिक्षकवृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालय प्रशासन, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला अत्यंत शिस्तबद्ध, उत्साही व देशभक्तीपूर्ण वातावरण प्राप्त झाले.

हर घर तिरंगा अभियान, नशामुक्त समाज, राष्ट्रभक्ती आणि सायबर सुरक्षितता या चारही महत्त्वपूर्ण संदेशांचा एकत्रित प्रसार करणारा हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरला. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्यासोबतच आधुनिक डिजिटल युगातील सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचा संदेश या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला.

सायबर पोलीस स्टेशन, सातारा व एस.जी.एम. कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सुरक्षित नागरिक - सायबर सुरक्षित समाज या संकल्पनेला यामुळे निश्चितच बळ मिळाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘जुन्या कुणबी नोंदींचा डबा समाजासाठी उघडा’; जरांगेंची उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंकडे मागणी
पुढील बातमी
तब्बल 15 वर्षांनी मुलगा सुखरूप घरी; वडील व नातेवाईकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; उंब्रज पोलिसांचे सहकार्य

संबंधित बातम्या