अजमेर : राजस्थानमधील अजमेर दर्ग्याबाबत एक मोठा दावा करण्यात आला आहे. या ठिकाणी शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान अजमेर दर्ग्याच्या ठिकाणी शिवमंदिर असल्याचा दावा करणारी एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने ही याचिका स्वीकारली आहे. अजमेर दर्ग्याच्या ठिकाणी शिवमंदिर असल्याची याचिका स्वीकारल्यानंतर कोर्टाने सर्व पक्षकरांना नोटिस देखील बजावली आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
दर्ग्याच्या ठिकाणी शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर मुस्लिम समाजाने देखील आपली प्रतिक्रिया दिल्याचे म्हटले जात आहे. ऑल इंडिया सूफी सज्जादानशिन कौन्सिलचे अध्यक्ष आणि ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तिचे वंशज नसीरुद्दीन चिश्ति यांनी या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. देशभरात अनेक ठिकाणी मशिदीच्या ठिकाणी मंदिर असल्याचे दावे केले जात असल्याचे ते म्हणाले. याबाबत आम्ही कायदेशीर पावले उचलणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
अजमेर दर्ग्याबाबत हिंदू सेनेकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदू सेनेच्या अध्यक्षांनी ही याचिका दाखल केली आहे. कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना ही याचिका स्वीकारली आहे. यावर 20 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. कोर्टाने दर्गा कमिटी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभगाला नोटिस बजावली आहे. 20 तारखेला कोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. अजमेर दर्ग्याच्या ठिकाणी या आधी भगवान श्री संकटमोचन महादेवाचे मंदिर होते असे या याचिकेत सांगण्यात आले आहे. दरम्यान आता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता यावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
उत्तरप्रदेश राज्यातील संभळ शहरात मशिदीवरुन हिंसाचार उफाळला आहे. या भागातील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या चकमकीत चार जणांचा मृत्यू तर 22 हून अधिक पोलिस जखमी झाले होते. याचदरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपावर आरोप केले आहेत आणि द्वेषाचे राजकारण म्हणून याचा उल्लेख केला आहे. पण नेमकं संभळ शहरात काय घडलं आहे?
संभळची शाही जामा मशीद हरिहर मंदिर असल्याबाबत दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर रविवारी (२४ नोव्हेंबर) न्यायालय आयुक्तांचे पथक मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी आले असता संभळमध्ये एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ इतका वाढला की संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि वाहनेही पेटवली. या काळात हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त समोर आले होते. ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन यांनी मंगळवारी (19 नोव्हेंबर) संभळच्या शाही जामा मशिदीला हरिहर मंदिर म्हणून संबोधत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात याचिका दाखल केली आणि न्यायालयाने मुस्लिमांचे ऐकून न घेता अडीच तास सुनावणी केली. सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने सात दिवसांची मुदत दिली आहे.