मुंबई : पुणे- मुंबई नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत. रेल्वे किंवा रस्ते मार्गाने प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात. परंतु हा प्रवास केवळ 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबई शहर जवळ येणार आहे. शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यापेक्षा कमी वेळ लागणार आहे. भारतीय रेल्वेचा हा हायपरलूप प्रकल्प आहे. त्यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हायपरलूप एक वेगाने धावणारी रेल्वे आहे. या रेल्वेसाठी व्हॅक्यूम ट्यूबमध्ये मॅग्नेटिक तंत्रज्ञानाचा पॉड्सचा वापर केला जातो. ही रेल्वे 1100 किमी वेगाने धावू शकतो. ती जगातील सर्वात वेगवान धावणाऱ्या रेल्वेपैकी एक आहे. त्यासाठी वीज खूप कमी लागते. प्रदूषण होत नाही. यामुळे पर्यावरणासाठी ही रेल्वे चांगली आहे. या रेल्वेत एकावेळी 24 ते 28 जण प्रवास करु शकतात. त्यांना वेगवान प्रवासाचा आनंद मिळणार आहे.
2019 मध्ये हायपरलूप रेल्वेची पहिली चाचणी यशस्वी झाली. यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी म्हटले की, देशात प्रवासाची पद्धत बदलत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हायपरलूप योजनेसाठी आयआयटी मद्रासला दोन वेळा एक मिलियन डॉलरची मदत केली आहे. तसेच यापुढेही ही मदत करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि आयआयटी मद्रास या प्रकल्पावर काम करत आहे.
मुंबई-पुणे व्यतिरिक्त, बेंगळुरू आणि चेन्नई दरम्यान हायपरलूप ट्रेन चालवण्याची देखील योजना आहे. यामुळे हे अंतर अवघ्या 30 ते 40 मिनिटांत पार होईल. हायपरलूपसारखी मॅग्लेव्ह ट्रेनही चीन तयार करत आहे. या रेल्वेचा 2025 पर्यंत ताशी 1100 किमीचा वेग गाठण्याचे उद्दिष्ट आहे. एक स्पॅनिश कंपनी युरोपातील शहरांना जोडण्यासाठी हायपरलूप प्रणालीवरही काम करत आहे. प्रकल्प यशस्वी झाल्यास मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे देशातील प्रवासाची पद्धतही बदलेल.