दिल्ली : दिल्लीत जंतर मंतरवर कॉक्रोज जनता पार्टीमार्फत नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. गेल्या २६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण सोडलं. त्यानंतर दिल्लीतील आंदोलन समाप्त होईल अशी चर्चा सुरू होती. मात्र कॉक्रोज जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम रहात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
यानंतर सरकारकडून जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सीजेपीच्या प्रतिनिधिंशी चर्चा केली. यानंतर बोलताना सीजेपीने प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत उद्यापर्यंत अल्टीमेटम दिला आहे. मात्र कॉक्रोज जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही असं स्पष्ट केलं. त्याचबरोबर आता सेंट्रल दिल्लीत प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आंदोलन सुरू करणार आहे. हे आंदोलन आजपासून सुरू होणार असून नीट पेपर लीक प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी केलेली मारहाण याच्या विरोधात हे आंदोलन असणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसने आपल्या सर्व जिल्हाध्यक्षांना कँडल मार्च आणि सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यास सांगितलं आहे.
इंटरनेट बंदवर त्वरित सुनावणी
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी जंतर मंतरवरील १.५ किलोमीटर रेडीयसचे इंटरनेट बंद करण्याच्या निर्णयाविरूद्धच्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्यास मान्यता दिली आहे. याचबरोर देशातील शेकडो वकिलांनी देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांना एक चिठ्ठी लिहून २१ जुलैच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच्या आंदोलनाबाबत न्यायालयीन हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
या विनंतीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांदी वाड्रा, अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदार हे हाय सिक्युरिटी झोनममध्ये कोणतीही पूर्वसुचना न देता आणि परवानगीशिवाय पोहचले होते. त्यामुळं कायदा आणि सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे असं देखील म्हटलं आहे.
सरकार सोबतच्या बैठकीत काय झालं
पुढचे दोन दिवस सुट्टी असल्यामुळं दिल्लीतील आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जमा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया आणि दिल्ली विद्यापीठातील २५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना लोधी कॉलनी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.
दरम्यान, आज सरकार आणि कॉक्रोज जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. त्यावेळी प्रमुख तीन मागण्यांवर चर्चा झाली. त्यातील दोन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. मात्र प्रमुख मागणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारने उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे.