सातारा : महाबळेश्वर- पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात झालेल्या भीषण कार अपघातात सातारा जिल्ह्यातील ८ युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख अशी एकूण ८ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.
कोकणातून घरी परतत असताना दि. २४ मे रोजी मध्यरात्री या युवकांची कार दरीत कोसळली होती. या अपघातात आठही युवकांचा मृत्यू झाला होता. अपघातात कार चालक संदीप काटकर (वय ३५ रा. खटाव) याच्यासह आसगाव येथील आदित्य अशोक साळुंखे (वय २०), महेश अनिल पवार (वय २५), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २३), अंश समीर चव्हाण (वय १८, रा. चिपळूण) असे ५ जण व मर्ढे ता. सातारा गावातील उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २२) आणि निखिल अभिमन्यू शिंगटे (वय २३) यांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेनंतर ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मृतांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा शब्द दिला होता.
याबाबत ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मृतांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मृताच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत जाहीर केली असून ही रक्कम आजच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा प्रतापगंज पेठ सातारा या शाखेच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. याबातची लेखी सूचना जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आली आहे.