कराड : कराड औद्यागिक वसाहत व ओगलेवाडी, हजारमाची परिसरातील लघु उद्योग खंडित वीजपुरवठ्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ओगलेवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. कार्यालयास कुलूप ठोकण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
कराड औद्योगिक वसाहत तसेच ओगलेवाडी, हजारमाची विभाग दोन महिन्यांपासून खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहे. सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने लघु उद्योग अडचणीत आले आहेत. उद्योजक तसेच ग्राहकांनी वारंवार वीज कंपनी कार्यालयाशी संपर्क करून वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत विनंती केली होती.
खंडित वीज पुरवठ्यामुुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या ओगलेवाडी कार्यालयात धाव घेतली. प्रशांत यादव, अधिक पाटील, कलबुर्गी, जिगजिने, विजय ननवरे, बापूसाहेब वंजारी, जे. डी. पाटील तसेच उद्योजक व ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकार्यांना धारेवर धरले. मागण्यांचे निवेदन वीज कंपनी अधिकार्यांना दिले.
यावेळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, अति.कार्यकारी अभियंता प्रसाद अवघडे, सहायक अभियंता तुषार खराडे उपस्थित होते.
प्रशांत यादव म्हणाले, ओगलेवाडी विभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.यामुुळे उद्योगांवर परिणाम झाला आहे. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुधवार दि. 28 मे पर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयास टाळे ठोकणार असून, शेकडो ग्रामस्थ कुटुंबासह कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करतील.
कराड औद्यागिक वसाहत व ओगलेवाडी, हजारमाची परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर पावसाळा होईपर्यंत या विभागातील एकही ग्राहक वीज बिल भरणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला. झाड पडले, तारा तुटल्या, पोल वाकले, पाऊस आला अशी कारणे देऊन वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे सांगून ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या खंडीत वीज पुरवठ्याच्या तक्रारींचा पाठाच अधिकार्यांसमोर वाचून दाखविला. यावेळी काहींनी भावना व्यक्त केल्या.
वीज वितरण कंपनी कार्यालयात ग्रामस्थांनी आक्रमक होत लेखी आश्वासन दिल्या शिवाय येथून हालणार नाही असा पवित्रा घेतला. यानंतर कार्यकारी अभियंता बी. टी. मोहिते यांनी आंदोलकांना देखी पत्र दिले. त्यामध्ये नमूद केले आहे की, वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी महावितरणतर्फे उच्चदाब वाहिनीची देखभाल दुरुस्ती तसेच 33/11केव्ही ओगलेवाडी उपकेंद्रामध्ये करावी लागणारी देखभाल दुरुस्ती बुधवार दि. 28 मेपर्यंत करण्यात येईल. अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. तसेच वादळी वार्यासह पावसाने तसेच इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे वीजपुरवठा खंडित झाला, तर तोही तातडीने सुरळीत करण्यात येईल.
पाऊस व वादळी वार्यामुळे दुर्घटना घडून वीजपुरवठा खंडित होत आहे. काही बिघाड क्लिष्ट स्वरूपाचे असल्याने दुरुस्तीला विलंब होत आहे. आठ दिवसांत सर्व दुरुस्त्या करून औद्योगिक वसाहतींचा वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.
बाळासाहेब मोहिते, कार्यकारी अभियंता ओगलेवाडी