अहमदाबाद : गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातानंतर बरीच खबरदारी घेतली जात आहे. अहमदाबादहूनलंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण काही समस्या निर्माण झाल्यामुळे रद्द करण्यात आले. उड्डाण रद्द झाल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून त्या विमानाचे उड्डाण न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, विमान अपघातानंतर पहिल्यांदाच एअर इंडियाचे विमान (AI-159) लंडनला जाणार होते. परंतु उड्डाणापूर्वी विमानाची तपासणी करण्यात आली आणि काही कारणास्तव उड्डाण रद्द करण्यात आले. हे विमान कधी सुरू होईल याबद्दल कोणतीही माहिती नाही. उद्या या विमानाचे उड्डाण होईल की नाही, याबद्दलही काहीही सांगण्यात आलेले नाही. याबाबत आता एअर इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे.
एअर इंडियाने म्हटले आहे की, "अहमदाबाद ते गॅटविक ही फ्लाइट AI159 आज रद्द करण्यात आली आहे, कारण विमान उपलब्ध नव्हते. हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि अतिरिक्त खबरदारीच्या तपासणीमुळे विमान नेहमीपेक्षा जास्त वेळ थांबवण्यात आले. कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण रद्द झालेले नाही. आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे आणि त्यांना त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. आम्ही हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करत आहोत आणि प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतफेड देखील केली जात आहेत. पण सध्या तरी, १७ जूनच्या दिवसभरासाठी लंडन गॅटविक ते अमृतसर ही फ्लाइट AI170 रद्द करण्यात आली आहे."
मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाण करण्यापूर्वी विमानात एक समस्या आढळून आली. त्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले. उड्डाण रद्द झाल्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या अनेक प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. या विमानातील बहुतेक प्रवासी राजकोट, आणंद, हलोल, खंभात येथील आहेत. विमान रद्द करण्याबाबत प्रवाशांनी सांगितले की, एअर इंडियाच्या टीमने विमान रद्द करण्यात आल्याचे सांगितले. AI 171 क्रमांकाऐवजी आता विमानाला AI 159 क्रमांक देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान आज दुपारी १:१० वाजता उड्डाण करणार होते. परंतु सकाळपासूनच उड्डाणे उशिराने सुरू झाली होती. त्यातच एका बिघाडामुळे हे विमान रद्द करण्यात आले. गेल्या आठवड्यात गुरुवारी अहमदाबादमधील मेघानीनगर येथे झालेल्या विमान अपघातानंतर, एअर इंडियाच्या विमानांमध्ये वारंवार बिघाड होत आहेत. उड्डाणादरम्यान अनेक विमानांना तांत्रिक अडचणी येत आहेत. हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाला बिघाडामुळे परतावे लागले आहे, तर अमेरिकेहून मुंबईला येणाऱ्या विमानाला कोलकातामध्ये सर्व प्रवाशांना उतरवावे लागले. यादरम्यान, कोचीहून मस्कतमार्गे दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंगही करण्यात आले आहे.