राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार आणि आचरण सर्वांनी आत्मसात करावे

भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांचे प्रतिपादन

by Team Satara Today | published on : 19 May 2025


सातारा : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रम उपक्रम राबवले जाणार आहेत. सातार्‍यात भाजपा पदाधिकार्‍यांना याबाबत माहिती देण्यासाठी याविषयीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर भोसले म्हणाले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान महाराष्ट्रातील असून अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांची बैठक मागच्या महिन्यात चौंडी येथे घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवींना आदरांजली वाहण्यात आली. अहिल्यादेवी यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर होता. अनेक संकटे त्यांच्यावर आली. परंतु त्यांनी न डगमगता धैर्याने या सर्व संकटांना तोंड दिले. अहिल्यादेवी यांनी अनेक सामाजिक कामे केली, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक नद्यांवरील घाटांची दुरुस्ती केली, अनेक नवीन घाट बांधले, महिला सबल आणि सक्षम होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी निर्माण केलेले घाट, मंदिर, स्मारक यांची स्वच्छता करणे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनावरील चित्ररथ, शोभायात्रा, महिला मेळावे, युवा मेळावे, महिला मॅरेथॉन, पथनाट्य,  वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन सामाजिक कार्य करणार्‍या महिला व सोशल मीडियातील प्रभावी व्यक्ती यांचे संमेलन, राजमाता अहिल्यादेवी यांच्या जीवन व कार्यावर प्रदर्शनी करणे.

भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी नागरिकांना सोबत घेऊन वरील सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करावेत आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदरांजली वहावी, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आयुष्यमान भारत योजनेकरिता 22 कोटी 41 लाखांचा निधी
पुढील बातमी
चालू वर्षात जिल्हा नियोजनचा ७४४ कोटी रुपये निधी मंजूर

संबंधित बातम्या