सातारा : मंगळवारी सातारा पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकुल यांनी छाननी प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेमध्ये नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या एकूण 338 अर्जांपैकी 31 अर्ज हे छाननी प्रक्रियेत बाद झाले आहेत.
सातारा पालिकेच्या निवडणूक कक्षा मधून रात्री उशिरा ही माहिती देण्यात आली. सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सोमवारी, दि. 17 रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता त्यावेळी 50 नगरसेवकांच्या जागांसाठी 320 तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 18 अर्ज दाखल करण्यात आले होते.
प्रांत आशिष बारकुल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव, मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या समितीअंतर्गत 338 उमेदवारी अर्ज यांची छाननी प्रक्रिया दिवसभर राबवण्यात आली. यावेळी बहुतांश उमेदवार प्रक्रियेत उपस्थित होते. नगराध्यक्ष पदाच्या एकूण 18 उमेदवारी अर्ज पैकी एक व नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 320 अर्जापैकी 30 असे एकूण 31 अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये जोडपत्र नसणे, डमी अर्ज भरणे, ठेकेदार नसल्याचा दाखला सादर न करणे इत्यादी कारणांमुळे हे अर्ज तांत्रिक निकषावरून बाद करण्यात आले.