दर्जेदार कामावर भर देणारा वक्तशीर राजकारणी - अजितदादा पवार ; महाराष्ट्राला चटका लावणारी एक्झिकट

by Team Satara Today | published on : 28 January 2026


पुणे महापालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत पुणे पॅटर्नच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री, पालकमंत्री असलेले अजित पवार पुण्याचे कारभारी झाले. पुणेमेट्रो प्रकल्प, पीएमपीएमएल आणि पीएमआरडीएची स्थापना, समान पाणी पुरवठा योजना, नदी सुधार योजना, पुणे महापालिकेत गावाचा समावेश, शहरी गरीब योजना, मुळा-मुठा नदी सुधार योजना प्रकल्पासह शहराच्या विविध भागातील उड्डाणपुलांची कामे अजित पवार यांच्या पुढाकाराने झाली. पुण्याच्या विकासाला गती आणि दिशा देण्याचे काम अजित पवार यांनी केले. स्पष्टवक्तेपणा, वक्तशीर आणि दर्जेदार कामासाठी आग्रही असल्यामुळे अजित पवार यांचे विकासाचा वादा अजित दादा हे समीकरण तयार झाले होते.

पुणे महापालिकेत २००७ पर्यंत काँग्रेसची एकहात्ती सत्ता होती. २००७ च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राळ उडवून देऊन या निवडणुकीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्याचा कारभारी बदला, असे आवाहन केले होते. त्याला पुणेकरांनी प्रतिसाद दिला होता. त्याचवेळी काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातून विस्तवही जात नव्हता. त्यामुळे सुरेश कलमाडी यांना काँग्रेसमधील सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठी खेळी खेळली होती. त्यावेळी भाजपचे नेते विनोद तावडे आणि शिवसेनेचे तेव्हाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांना विश्वासात घेतले होते. पुणे महापालिकेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, भाजपला बरोबर घेऊन ‘पुणे पॅटर्न’ तयार केला. राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी भोसले पुण्याचा महापौर झाल्या होत्या. शिवसेनेला उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. भाजपला स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. त्यावेळी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात हा ‘पुणे पॅटर्न’ मोठा गाजला होता. या पुणे पॅटर्नच्या माध्यमातून अजित पवार यांच्या पुणे महापालिकेच्या राजकारणात प्रवेश झाला.

पुणे महापालिकेत २००७ साली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे पॅर्टन मधून सत्ता आली. त्यावेळी अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. देशात काँग्रेस आघाडीचे (युपीए) सरकार असताना जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत पुण्याला सुमारे ३ हजार ९०० कोटीचा निधी मिळाला. त्यातून शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामेही झाली. पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि स्वागेट ते पिंपरी चिंचवड या दोन्ही मार्गासाठी राज्य सरकारकडून मंजुरी मिळवून दिली. मेट्रोसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पुणे शहरात पीएमटी आणि पिंपरी चिंचवडमधील पीसीएमटी यांचे एकत्रीकरण करून पीएमपीएमएलची स्थापना केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला. पीएमपीएमएलसाठी नवीन बसेसची खरेदी करून पुणेकरांना चांगली बस सेवा देण्यासाठी प्रयत्न केले. पुणे महापालिका हद्दीलगतची गावांचा समावेश करण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला. या गावांना पालिकेत घेऊन विकासकामांना सुरुवात केली. जपानच्या जायका कंपनीच्या सहकार्याने शहरात राबविण्यात येत असलेल्या मुळा-मुठा नदी सुधार योजनेच्या प्रकल्पाला त्यांनी गती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना गरीब लोकांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी शहरी गरीब योजना आणण्यात आली. सुरुवातीला १ लाखापर्यंत करण्यात येणारी मदत आता दोन लाखापर्यंत नेण्यात आली आहे. पालिकेच्या वतीने इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम अर्थसहाय्य योजनेतंर्गत १५ हजार आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजनेतंर्गत २५ हजाराची विशेष शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केली. पद्मावती येेथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृह आणि औंध येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहाची कामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झाली. 

भामा आसखेड, मुळशीतून पुण्याला पाणी

केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीची सत्ता असताना पुणे शहराच्या पूर्व भागाचा पाणी सोडविण्यासाठी भामा आसखेड पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात येऊन पूर्ण केली. भामा आसखेड धरणातून पुण्याला २.६४ टीएमसी पाणी मिळाले आहे. त्यामुळे धानोरी, वडगावशेरी, लोहगाव या भागाचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी ७ टीएमसी पाणी मुळशी धरणातून देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. या निर्णयासाठी अजित पवार यांनी शेवटपर्यंत पाठपुरावा केला 

दर्जदार कामावर भर देणारा वक्तशीर राजकारणी

पुणे शहरातील अनेक उड्डाणपुलाचे उद्घाटन अजित पवार यांनी सकाळी सहा वाजता केले आहे. त्यासाठी ते वेळेवर हजर असायचे. या कार्यक्रमाला उशिरा कोणी आले तर अजित पवार आपल्या खास शैलीत हजेरी घेत होते. वेळेबाबत दादा जसे काटेकोर आहेत तसेच कोणत्याही कामाच्या दर्जा ते कधीही तडजोड करीत नाहीत. टापटीप आणि नीटनेटकेपणा बरोबर दर्जेदार कामावर त्यांचा भर होता. कामाची पाहणी करताना ते बारीकपणे सर्व बाबीची माहिती घेत होते. त्यामुळे अधिकारी अर्लट असत. अजित पवार यांची दर्जेदार कामावर भर देणारा वक्तशीर राजकारणी अशी ओळख होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्याच्या राजकारण आणि समाजकारणातील एक अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व गमावलं - माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील
पुढील बातमी
ममता बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीच्या मागणी; हा अपघात, यामध्ये राजकारण करु नका- शरद पवार यांना अश्रू अनावर

संबंधित बातम्या