जिल्ह्यात आजपासून होणार शाळा सुरू

विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने होणार स्वागत

by Team Satara Today | published on : 15 June 2025


सातारा : शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सोमवार, दि. १६ जूनपासून सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी सातारा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. याचबरोबर प्राथमिक शिक्षण विभागाकडूनही पहिल्याच दिवशी नवीन मोफत पुस्तके देण्यात येणार आहेत. पहिली ते आठवीच्या सुमारे २ लाख ३९ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

समग्र शासनाच्या शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके मिळावीत, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन झाले होते. त्यामुळे विभागाने बालभारतीकडे पुस्तकांसाठी ऑनलाईन नोंदणीही केलेली आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या २ लाख ३९ हजार ४८३ विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके आहेत.

सातारा जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाकडून १३ लाख ४८ हजार ८५२ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार १३ लाख ४८ हजार ५१२ पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. म्हणजे मागणीप्रमाणे पुस्तके जिल्ह्याला मिळाली आहेत.

नवीन शैक्षणिक वर्ष हे १६ जूनपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात पुस्तकांचा पुरवठा झालेला आहे. मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध झाली आहेत. ही पुस्तके सर्वच तालकास्तरावरून केंद्रशाळावरही पोहोच

झाली आहेत. त्यामुळे १६ जूनला म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार आहेत. सोमवारी शाळा सुरू होणार असल्याने बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गणवेश, बूट आणि पायमोजे यांचेही वाटप मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस हा एखाद्या उत्सवाप्रमाणेच असणार आहे.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत करण्यात येणार आहे. त्यांना मोफत पाठ्यपुस्तके तसेच गणवेश, बूट आणि पायमोजे वाटप होणार आहे. विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणेच साजरा करुन तिथी भोजनाचेही आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आणि पालकांनीही कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे.
- याशनी नागराजन, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी
पुढील बातमी
एसटी अपघातात एकाचा मृत्यू

संबंधित बातम्या