सातारा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त लोणंद येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडावा आणि विठ्ठलाने पावसाच्या रूपाने राज्यावर कृपादृष्टी ठेवावी. विठ्ठलाने पावसाच्या रूपाने आशीर्वाद द्यावा, राज्यात चांगला पाऊस पडावा आणि बळीराजाच्या आशा पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थना माऊलींच्या चरणी केल्याचे सांगितले.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन हा लाखो वारकऱ्यांसाठी अत्यंत भक्तिमय आणि आनंदाचा क्षण आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक आणि चोख नियोजन केले आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून वारकऱ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवास, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेची प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे.
वारकरी हा महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आत्मा आहे. त्यांच्या सेवेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले असून पालखी सोहळा कोणताही अडथळा न येता, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात पार पडावा, यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.